। गडब । वार्ताहर ।
गडब- खारमाचेला येथील शेतकर्यांनी पुकारलेल्या आत्मदहनाच्या इशार्यामुळे खारलॅन्ड प्रशासनाने नमले असून त्यांनी तात्काळ सदर नैसर्गिक उघाडीचा नाला यंत्रसामग्रीच्या माध्यमातून खुला करून घेतला आहे. पेण तालुक्यातील खारमाचेला येथील असणारी उघाडी (नैसर्गिक नाला) काही महिन्यांपूर्वी येथील जेएसडब्ल्यु कंपनीने पाईप टाकून बंद केला. त्यामुळे येथील शेतकर्यांवर अन्याय होऊन मच्छीमारी करता येत नव्हती.शेतजमीन नापीक होऊन येथील शेतकर्यावर व मच्छीमारांवर सुद्धा उपासमारीची वेळ आल्याने अखेर बापदेव शेतकरी मंडळ खारमाचेला यांच्या माध्यमातून 26 डिसेंबरला शेतकरी व मच्छीमार प्रांत कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार आज सकाळपासूनच पोलिस प्रशासनाने प्रांत कार्यालयाला बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.मात्र शेतकर्यांवर अन्याय होऊ याकरीता जिल्हा परिषद माजी सभापती संजय जांभळे, सामाजिक कार्यकर्ते राजु पाटील, समिधा पाटील यांनी खारलॅन्डच्या अधिका-या समोर ठाण मांडून ही समस्या तातडीने सोडवा अशी मागणी केली असता खारलॅन्ड अधिकारी सुरेश सावंत यांनी लागलीच यंत्रसामुग्रीसह त्याठिकाणी जाऊन जेसीबीच्या सहाय्याने सदर बंदिस्त असणारी उघाडी मोकळी केली . े उर्वरित काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करणार असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले.
खारमाचेला येथील उघाडी (नैसर्गिक नाला) जेएसडब्ल्यु कंपनीने पाईप टाकून बंद केला होता.त्यामुळे आमच्या शेतीवर तसेच मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याने याकरिता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता मात्र खारलॅन्ड प्रशासनाने तातडीने सदर नाला खुला केला असून उर्वरित काम येत्या 15 दिवसात करण्यात येणार असल्याचे पत्र संबंधित अधिकारी यांनी दिल्यामुळे सदर आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आला आहे. – सुनील कोठेकर, अध्यक्ष, बापदेव शेतकरी मंडळ खारमाचेला
येथील बांधाना खांडी जाऊन शेतकर्याच्या शेतात खारे पाणी जात होते.यामुळे खारभूमी विभागाने आमच्याकडे सदर बांधबदिस्तीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार सीएसआर फंडातून हे काम केले आहे. खारभुमी विभागाचे सहकार्याने बांध बांधले आहेत त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या जमिनी वाचल्या आहेत. – नारायण बोलबंडा – अधिकारी जेएसडब्ल्यु