ट्रक उलटून चालक गंभीर जखमी
| तळा | प्रतिनिधी |
तळा शहराजवळील ‘तारणेची डाग’ (वळण) आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. गुरुवारी (दि.2) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या तीव्र उतरत्या वळणावर पुन्हा एक थरकाप उडवणारी घटना घडली. एक अवाढव्य ट्रक या धोकादायक वळणावर उलटला असून, चालक ट्रकमध्येच अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चालक मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे. या अपघातानंतर “कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तांत्रिक चुकांमुळे वर्षभरात चार मोठे अपघात
इंदापूर ते आगरदांडा या महामार्गावर अशी अनेक भयानक वळणे आहेत जी अपघातांना आमंत्रण देत आहेत. तारणेच्या याच वळणावर वर्षभरात चार मोठे अपघात घडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद केवळ ‘अपघात’ म्हणून केली जाते. परंतु, या अपघातांचे खरे कारण चालकाची चूक नसून, नव्याने बांधलेला रस्ता आणि त्यावरील धोकादायक वळण हेच असल्याचे उघड झाले आहे.
रस्ता की अभियंत्यांचा निष्काळजीपणा?
रस्ता तयार करताना संबंधित यंत्रणेने कोणताही तांत्रिक विचार केला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महामार्गावरील वळणाचा कोन आणि त्याचा तिरकेपणा किती असावा, याचा कोणताही अभ्यास न करता हा रस्ता बनवल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे. जाणकार चालकांच्या मते, एकाच वळणावर जर वारंवार अपघात होत असतील, तर त्याला केवळ चालक जबाबदार नसून, रस्ता बनवणारे कंत्राटदार आणि संबंधित अभियंतेही तितकेच जबाबदार आहेत.
गुन्हे दाखल करा; नागरिकांची आक्रमक मागणी
शेकडो नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर आणि कामावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मुख्य मागण्या
1. या संपूर्ण रस्त्याचे तातडीने ‘तांत्रिक ऑडिट’ करून दोषींवर कडक कारवाई व्हावी.
2. अपघात रोखण्यासाठी तीव्र उतारापासून समान उंचीचे रबरी स्पीड ब्रेकर बसवावेत.
3. वळणावर रेडियम इंडिकेटर्स, गतिरोधक, धोक्याचे सिग्नल आणि मार्गदर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. अशा मागण्या करण्यात येत असून, वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे गांभीर्याने पाहणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार? याकडे आता संपूर्ण तळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.







