। पेण । प्रतिनिधी ।
गेली 15 दिवस भोगावती नदीमध्ये झालेल्या उत्खननाबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिध्द करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाच्या कातडीच्या प्रशासनाला काहीच फरक पडला नाही. अखेर निसर्गप्रेमी प्राध्यापक उदय मानकवळे यांना एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याची वेळ आली.
आठ दिवसापूर्वी याबाबत प्राध्यापक मानकवळे यांनी तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे भोगावती नदीमध्ये चाललेल्या अनधिकृत कामाबद्दल आपले म्हणणे मांडले होते. परंतु याबाबत तहसिल कार्यालयातून कोणतीच दखल घेतली नाही. त्यावेळी प्रा. उदय मानकवळे यांनी नदी वाचविण्यासाठी माफक मागण्या केल्या होत्या. भोगावती नदीचे सीमांकन करून पूररेषा निश्चित करा. महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे सीमांकन करून उगमस्थान ते संगम स्थानापर्यत पूररेषा दर्शक माहिती फलक लावा. नद्यांवरील पूररेषेच्या आतील अतिक्रमण त्वरीत काढून टाका. गटाराचे पाणी, रासायनिक द्रव्य इतर मानवनिर्मित कचरा, प्लास्टिक नद्यांमध्ये टाकण्यास बंदी करा. महाराष्ट्रातील सर्व नद्यांना झेड सिक्युरिटी द्या. नदी काटावरील जैवविविधतेचे संरक्षण करा. तसेच भोगावती नदीमध्ये चाललेले अतिक्रमण तातडीने थांबवा, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. मात्र याकडे महसुल तसेच जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले.
हे धरणे आंदोलन प्रशासनाला चेतावणी आहे. भोगावती नदी संदर्भात ठोस पावले जर प्रशासनाने उचली नाही तर येत्या काळात आमरण उपोषण केले जाईल. आज पेणची जीवनवाहिनी ही भोगावती नदी आहे. परंतु अतिक्रमण आणि प्रदूषणाने तिला वेढले आहे. हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.
उदय मानकावळे,
उपोषणकर्ते
सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच सिडकोने नदीमध्ये अतिक्रमण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सिडकोविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच अतिक्रमणाबाबत आम्ही ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चितीकरण केले आहे. ते मंजूरीसाठी वरिष्ठांकडे पाठवले आहे. परवानगी मिळताच पोलीस यंत्रणेच्या मदतीने आम्ही नदीतील अतिक्रमण हटवणार.
आकाश ठोंबरे,
उपअभियंता, जलसंपदा विभाग







