| खांब | वार्ताहर |
शेतीसाठी कालव्याचे आवश्यक पाणी मिळत नसल्याने गेली 10 ते 12 वर्षे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असल्याने या वर्षीच्या उन्हाळी हंगामात कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी रोहा तालुक्यातील देवकान्हे-धामणसई विभागातील शेतकरीवर्ग आक्रमक झाला आहे. तर पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन याबाबत लक्ष वेधले आहे. सन 2012 पासून कुंडलिका उजवा तीर अष्टमी शाखेला शेतीसाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले नसल्याने शेती व शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत देवकान्हे पाणी वापर संस्था-2 यांनी चालू हंगामात शेतीसाठी कालव्याचे पाणी सोडण्यात यावे यासाठी संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे 15 डिसेंबरपर्यंत कालवा दुरूस्ती व गाळ काढण्याचे काम पुर्ण करून 15 डिसेंबरपर्यंत पाणी न सोडल्यास विभागातील ग्रामस्थ व शेतकरी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाच्या कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असे अध्यक्ष बाबूराव बामणे यांनी सांगितले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव बामणे, वसंत मरवडे, कुमार शिर्के, सदानंद जाधव, संदीप महाडिक, संतोष भोईर, धोंडू कचरे, गुणाजी माळी, खेळू ढमाळ, भिमेश बामणे, मनोज शिरोडकर, पांडुरंग कचरे, किशोर जाधव, महेश मरवडे, नथुराम भोईर, दत्ता भोईर, शांताराम महाडिक, राम सावंत, महेश तुपकर, शैलेश कदम, सखाराम कचरे, महेश भोकटे, गणपत शिंदे, राम शेलार, तुकाराम कोंडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.