संभाजीनगरच्या सभेत मविआचा हल्लाबोल
| संभाजीनगर | प्रतिनिधी |
सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारला आगामी सर्वच निवडणुकांमध्ये वज्रमुठ दाखविण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्यावतीने रविवारी (2 एप्रिल) संभाजीनगर येथे करण्यात आला. भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेले हे सरकार हद्दपार करण्यासाठी आम्ही वज्रमुठ बांधली असल्याचे मविआ नेत्यांनी जाहीर केले.
शिंदे, भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता राज्यभर जाहीर सभा घेतल्या जात आहे. रविवारी संभाजीनगरच्या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, धनंजय मुंडे, अंबादास दानवे,चंद्रकांत खैरे आदींसह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हिंदूंचा आक्रोश दुर्दैवी-ठाकरे
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना भाजपला हिंदू आक्रोश करावा लागतोय हे दुर्दैवी असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. अवश्य काढा. सध्या अनेक ठिकाणी हिंदु जनआक्रोश यात्रा काढण्यात येतोय. मुंबईतही हा मोर्चा निघाला. शिवसेना भवनासमोर हा मोर्चा आला होता. सध्या देशाचे पंतप्रधान हिंदू आहेत. तरी तुम्हाला हिंदू जनआक्रोश मोर्चा का काढावा लागतो, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
आपण काही करायचं नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं, यांनीच दंगली घडविल्या या आधीही मी संभाजीनगरला आलोय, याच शहरात 1988 साली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली आणि शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव बदललं, संभाजीनगर. गेली 25 वर्षे आपण भ्रमात होतो, भाजपसोबत आपली युती होती. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भाजपला जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. करायचं काय नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं ही भाजपची खेळी. दंगली घडवल्या जातात, त्यामुळे निवडणुका जवळ आल्याचं समजू घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सावरकरांना भारतरत्न द्या -पवार
आम्ही वज्रमुठ सभा आयोजित केली म्हणून सत्ताधार्यांना गौरवयात्रा काढायचं सुचतंय. तुमच्यात धमक असेल, खरंच सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधार्यांना विचारला. फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे चाललंय. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचं काय कारण होतं? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही? अशी विचारणाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग इथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? 75 हजार नोकर्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे, अशी टीकाही पवारांनी केली. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? असा सवालही त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला विचारला.
काँग्रेसे नेत्यांची टीका
यावेळी निर्णय बेभान, प्रसिद्धी वेगवान असं हे सरकार असल्याचे चव्हाण म्हणाले.तर बाळासाहेब थोरात यांनी विरोधात बोलणार्याला ईडी लावली जाते, विरोधात बोलायचं नाही अशी परिस्थिती राज्यात आणि केंद्रात असल्याबद्दल तीव्र टीका केली. अदानींच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये कुठून आले याचं उत्तर सरकाराने दिलं नाही असे बाळासाहेब थोरात यांनी विचारले.