गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी

। नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ असलेल्या गतिरोधकामुळे होणार्‍या अपघाताची मालिका सतत सुरूच आहे. सोमवारी (ता.8) सायंकाळी सहाच्यादरम्यान पळस येथील राहणार्‍या छाया शिर्के (वय 45) यांचा या गतिरोधकामुळे अपघात होऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. पळस येथे राहणारे उदय शिर्के आपली आई छाया शिर्के यांना आपल्या मोटरसायकलवरून नागोठणे रेल्वे स्थानकातून आपल्या घरी घेऊन चालले होते. उदय मोटारसायकल चालवत होते; तर त्यांची आई मागे बसली होती. रुची हॉटेलसमोरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने गाडी गतिरोधकावर आदळून जोराने उडाली. गतिरोधकाच्या दणक्याने मागे बसलेल्या शिर्के या काहीशा हवेत उडून खाली कोसळल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ नागोठणे येथील सरकारी दवाखान्यात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यास सांगितले. मात्र मुंबईत नेतानाच प्रवासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version