आपदा मित्र शिबिराचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळ महाविद्यालयात ‌‘युवा आपदा मित्र योजने’ अंतर्गत दि.2 ते 8 जानेवारी या कालावधीत 8 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एनसीसी उमेदवारांना तयार करणे हा आहे. 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीतीश पटियाल यांच्या कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे ॲडज्युटंट कॅप्टन मोहसीन खान यांनी या शिबिराच्या यशस्वी संचालनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शिबिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाच्या जबाबदारीसह उमेदवारांची शिस्त आणि प्रशिक्षणाची रूपरेषा देखील तयार केली. या शिबिरात एकूण 150 उमेदवारांनी सहभाग घेतला आहे.

या शिबिरादरम्यान उमेदवारांना जमिनी स्तरावर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुभेदार मेजर अमरबीर सिंह यांनी चोखपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विविध कठीण परिस्थितींना तोंड देण्याचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सागर पाठक यांनी आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील तांत्रिक पैलू समजावून सांगण्यासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मनोहर म्हात्रे व प्रदीप कोंडेकर या तज्ज्ञांनी उमेदवारांना पूर, भूकंप, आग आणि प्रथमोपचार यांसारख्या विषयांवर सखोल व्यावहारिक ज्ञान दिले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना, असे शिबीर तरुणांमध्ये समाजसेवा आणि सतर्कतेची भावना निर्माण करतात, असे सांगितले. तसेच, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्रा. प्रोफेसर सोनाली पाटील यांनी शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालय परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि उमेदवारांचा उत्साह वाढवला.

Exit mobile version