सारथीचे मोफत सुरक्षा कवच
| कर्जत । वार्ताहर ।
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातानंतर आपत्कालीन 72 तासांच्या आत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार, असे सांगण्यात आले आहे. ही योजना अजूनही कार्यरत नसल्याने रुग्णांना याचा कोणताही लाभ मिळत नाही. शासनाने रस्ते अपघातात सापडलेल्या रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळून त्यांचे प्राण वाचवता यावे म्हणून ही योजना लागू केली आहे. मात्र या योजनेचा शुभारंभ कोणत्याही जिल्ह्यात तथा पालिका क्षेत्रात झाला नाही. त्याचबरोबर खासगी व शासकीय रुग्णालयांनी ही योजना अंगीकृत केली नाही. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त रुग्णांना ताबडतोब उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचून मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास त्याचा अनेकांना लाभ होईल असे महत्वपूर्ण प्रतिपादन सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे विनय मोरे यांनी येथे केले.
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयात समर्थ ड्रायव्हिंग स्कुलच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा अभियानच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या चर्चा सत्रानिमित्ताने एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विनय मोरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे अनोखे मार्ग जसे की रेडियम दिवे आणि कपडे वापरणे, विरुद्ध हाताने दरवाजा उघडणे, प्रवास करताना लाईव्ह लोकेशन शेअर करणे, फोन नंबर लॉक स्क्रीनवर ठेवणे आदीची माहिती दिली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, विनय मोरे, निलेश मराठे प्रा. डॉ. मोहन काळे, अभिजीत मराठे, प्रा. रुपाली येवले, प्रा. निलोफर खान, प्रा. तनिष्का ठाकरे उपस्थित होते. निलेश धोटे यांनी, वाहन चालविताना आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपले नुकसान होतेच परंतु कारण नसताना अन्य पादचारी किंवा वाहन चालकांना नुकसान पोहोचते. त्यामुळे एखाद्याचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते असे स्पष्ट केले.