। मुंबई । प्रतिनिधी ।
नुकताच दिवाळीचा सण पार पडला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोमाने व्यवसाय सुरु असल्याने व्यापारी वर्गात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मात्र, आता राजधानी दिल्लीसह देशभरातील व्यापार्यांसाठी येणारा काळही अधिक आनंदाचा असणार आहे. कारण 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंतचा काळ हा लग्नाचा सीझन असणार आहे. नुकत्याच सीएआयटी रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या कालावधीत देशभरात सुमारे 32 लाख विवाह होतील. ज्यामध्ये साधारण 3.75 लाख कोटींची आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सीएआयटीने सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, या हंगामात सुमारे 5 लाख विवाहांसाठी प्रत्येकी अंदाजे 3 लाख रुपये खर्च येईल. तर, सुमारे 10 लाख विवाहांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये खर्च येईल. 10 लाख लग्नांसाठी 10 लाख रुपये, 5 लाख लग्नांसाठी 25 लाख रुपये, 50,000 लग्नांसाठी 50 लाख रुपये आणि आणखी 50,000 लग्नांसाठी 1 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च करण्यात येईल. या एका महिन्यात लग्नाच्या खरेदीतून सुमारे 3.75 लाख कोटी रुपये व्यापार क्षेत्रात येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर, लग्नाच्या हंगामाचा पुढचा टप्पा 14 जानेवारी 2023 पासून सुरू होऊन तो जुलैपर्यंत असेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सीएआयटीने सांगितले की, फक्त दिल्लीत या आगामी हंगामात 3.5 लाखांहून अधिक विवाहसोहळे अपेक्षित आहेत. या विवाहातून सुमारे 75,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 25 लाख विवाह झाले होते आणि त्यासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
व्यापार्यांकडूनही जोरदार तयारी
सीएआयटीने म्हटले आहे की, लग्नाच्या हंगामातील चांगल्या व्यवसायाची शक्यता लक्षात घेऊन, देशभरातील व्यापार्यांनीही मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तसेच, ग्राहकांची मागणी लक्षात घेता व्यापारीदेखील आपल्या व्यवहारातील प्रत्येक वस्तूंकडे प्रकर्षाने लक्ष देत आहेत. व्यापार्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक लग्नाचा सुमारे 20 टक्के खर्च वधू-वरांवर जातो. तर, 80 टक्के खर्च लग्नाच्या इतर आयोजनात जातो.