कॉरिडॉरसाठी नव्या कायद्यानुसार भूसंपादन करा

उरणच्या शेतकर्‍यांची मागणी
उद्या पनवेलमध्ये मोर्चा

| उरण | वार्ताहर |

बहुद्देशी अलिबाग-विरार कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाला संमतीने जमिनी देण्यास उरणच्या शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच शेतकर्‍यांच्या अधिक लाभाच्या 2013 च्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायद्याच्या आधाराने संपादन करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.यासाठी 10 मे रोजी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री उरण तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांची दादरपाडा येथील हनुमान मंदिरात बैठक झाली. या बैठकीत हा निर्धार करण्यात आला. या वेळी शेतकर्‍यांचा विकास आणि भूसंपदनाला विरोध नाही. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना जमिनीच्या प्रचलित बाजारदरानुसार जास्तीत जास्त दराचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हणून प्रकल्पग्रस्त दाखला, शिल्लक राहणार्‍या जमिनी, घरे, रहदारीचे मार्ग, बागायतीचा योग्य मोबदला याचे ठोस आश्‍वासन एम.एस.आर.डी.सी. आणि शासनाने दिले पाहिजे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. यासाठी शेतकर्‍यांनी भूसंपादन अधिकार्‍यांना लेखी निवेदनही दिले आहे. या बैठकीला अलिबाग-विरार कॉरिडॉर समितीचे उरण अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष ठाकूर, सचिव रवींद्र कासुकर, सुधाकर पाटील, संजय ठाकूर, वसंत मोहिते आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात शासन आणि एम.एस.आर.डी.सी.ने चर्चा करून निर्णय घ्यावा. त्याशिवाय जमीन संपादन करू देणार नाही. ही भूमिका घेत 10 मे रोजी पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

Exit mobile version