अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात 70 हजार 929 गौरी-गणपतींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. टाळ-मृदूंग अशा पारंपारीकतेच भजन किर्तनाची कास धरीत गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला. या वेळी ठिकठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर भाविकांनी सोशल डिस्टन्सींचे पालन करून आपल्या बाप्पाला निरोप दिला. तर बाप्पाला निरोप देताना काहींना अश्रु ही अनावर झाले. कोकणात गौरी-गणपतीच्या सणाचा मंगळवारी संध्याकाळी समारोप झाला. पाच दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले.जिल्ह्यात 75 सार्वजनिक, 56 हजार 460 घरगुती गणपतींचे तर 14 हजार 429 गौरींचेविसर्जन करण्यात आले. अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरूड, श्रीवर्धन आणि रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. तर इतर ठिकाणी नदी आणि तलावांमध्ये गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
काहींनी कृत्रीम तलावामध्ये तर काहींनी घरच्या घरी आपल्या बाप्पाला निरोप दिला.उत्तर रायगडातील रोहा, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आणि म्हसळा पोलादपूर परिसरात गणोशिवसर्जन मिरवणुकीत पारंपरिक सनई आणि खालुबाजाचा जोश पहायला मिळायचा मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी सनईचा नाद घुमाला नाही. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संध्याकाळी चार वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरु वात झाली. ठिकठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी सामुदायिक आरत्यांचेही पठन करण्यात आले. या वेळी सजवून आणलेल्या गौरींचेही विसर्जन करण्यात आले.विसर्जना नंतर गणेश मुर्तींची होणारी विटंबना आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने गणपती विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यावर विशेष खबरदारी घेण्यात आली होती. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या वेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी भाविकांना दिला. दरम्यान कोकणातील गौरी-गणपतींच्या उत्सवाचा मंगळवारी समारोप झाल्याने चाकरमानी बुधवारी सकाळपासून परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.