संपर्क भाषा म्हणून आगरी भाषेतच संवाद साधा – अध्यक्ष सुरेश भोपी
| पनवेल । प्रतिनिधी ।
आपण आगरी आहोत आपली मातृभाषा आगरीबोली आहे, आता आपण पेटून उठू या… आगरी बोलीचा वापर आपल्या घरापासून करुया… संपर्कभाषा म्हणून पण आगरी बोलीतूनच संवाद साधू या… आपली अस्मिता जपू या…असे आवाहन दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश भोपी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल इथे दि.बा. पाटील साहित्य नगरीत रविवारी (दि.28) उत्साहात संपन्न झाले. डॉ. अविनाश पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. गझलकार ए.के. शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर इंटकचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल म.न.पा.चे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश म्हात्रे, विकास घरत, कवी रोहिदास पोटे, साहित्यिक संदीप बोडके, मिनल बसमतकर असे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणातून अविनाश पाटील म्हणाले, आगरी माणसाने हातात लेखणी पकडली असून तो आता प्रगतीच्या दिशेकडे झेपावतोय. असे असतांना तो आपली संस्कृती व परंपरा यांची जोपासना करतोय, हे विशेष वाटतेय. प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना ए.के. शेख यांनी गझल सादर करुन रसिकजनांना मंत्रमुग्ध केले. दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांनी मुख्यपाहुणे या नात्याने प्रतिक्रिया देताना आगरी समाजाची प्रगती प्रशंसनीय असून, हा समाज साहित्य संमेलनांचे आयोजन करतोय हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे, असे म्हटले.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी प्रास्ताविक भाषण करताना आगरी चळवळ व इतिहासाचा धांडोळा घेतला. कृष्णा जोशी, रमाकांत म्हात्रे व चंद्रकांत कांडपिळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिभावंतांच्या पुस्तकांचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अविनाश पाटील, म.वा.म्हात्रे, सुरेश भोपी व स्मिता वाजेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच, मुख्य संपादक जयंत पाटील व संपादक मंडळ यांच्या प्रयत्नातून तयार केलेल्या आगरी अस्मिता या साहित्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘आगरी संस्कृती’ या विषयावर आधारित परिसंवाद खूप छान रंगला. चंद्रकांत पाटील, के.एम. मढवी, डॉ. शोभा पाटील, सर्वेश तरे यांनी आगरी बोलीतून आपले विचार व्यक्त करुन रसिक जनांच्या काळजाला हात घातला.
गायिका अवनी पाटील, संगीता पाटील व मनस्वी माळी यांनी सुरेल आवाजामध्ये तालासुरात आगरी धवळेगीतांचे सादरीकरण करुन उपस्थितांच्या मनावर गारूड केले. तर सत्तर कवींनी सहभाग नोंदवून आपल्या कवितांचे सादरीकरण केले. पालघर, भिवंडी, रोहा, कल्याण, ठाणे, पेण, अलिबाग, पनवेल, उरण अशा विविध भागातून आलेल्या कवीमंडळींनी कविता सादरीकरणाचा आनंद लुटला. म.वा. म्हात्रे व मीनाक्षी तांडेल यांनी कवीसंमेलनाचे नेतृत्व केले.
आगरी जीवन गौरव पुरस्कार, आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार, आगरी साहित्य गौरव पुरस्कार, आगरी कला गौरव पुरस्काराने समाजातील प्रतीभावंत व कलावंतांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीङ्गळ देऊन सन्मानित करण्यात आले. समारोप समारंभात कार्याध्यक्ष मिनल माळी यांनी आपले मनोगत सादर केले. स्मिता वाजेकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रज्ञा म्हात्रे, उर्मिला घरत, जीविता पाटील, नम्रता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गायक अरुण द. म्हात्रे यांच्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.