विकासनिधी अडवल्याचा आरोप
| मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुचनेनुसार भाजप आमदारांचा विकासनिधी अडवावा लागला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यानी मंगळवारी विधानसभेत केला.
सत्ताधारी आमदारांना अधिक निधी वाटप करतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने आज विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकार व विशेषत: अर्थमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. आमदारांच्या निधी वाटपावरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावरुन अजित पवारांनी उत्तर दिले. निधीवाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी संध्याकाळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. 41 हजार कोटी रुपये पुरवणी मागण्या कशा झाल्या वगैरे प्रश्न सदस्यांना पडले. पण त्यामागचं कारणही सभागृहानं समजून घेतलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. मात्र, यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांचं समाधान होऊ शकलं नाही. यावर विरोधी आमदारांनी केलेल्या गोंधळातच पुरवणी मागण्या विधेयत सभागृहासमोर मांडण्यात आलं.
वाजपेयींच्या पुतळ्याला परवानगी नाही
मुंबईचे खा.गोपाळ शेट्टी यांच्या मतदार संघात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यासाठी शेट्टी यांनी अनुमती मागितली होती. त्यावेळी तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून हा पुतळा उभारण्यासाठी अनुमती दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. पण ठाकरे यांनी पुतळा उभारण्यास अनुमती दिली नाही. हे अत्यंत चुकीचे केले, अशी टीकाही पवारांनी यावेळी केली. वाजपेयींसारख्या मोठ्या नेत्यांचे पुतळे उभारण्यासाठी तत्कालीन मविआ सरकारने अनुमती देऊ नये, याची खंत मला वाटली, अशी नाराजीही त्यांनी केली.
नाना पटोलेंची टोलेबाजी!
दरम्यान, अजित पवारांच्या उत्तरानंतर नाना पटोलेंनी त्यावर विरोधी पक्षांची भूमिका मांडली. मविआच्या सरकारमध्ये अजित पवारच उपमुख्यमंत्री होते. खरंतर विद्यमान मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी जो त्रास दिला होता, त्या पद्धतीचा त्रास त्यांना द्यायला पाहिजे होता. तुम्ही तसा त्रास देत होतात असं शिंदे गटाचे आमदार सांगत होते. म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय. आमचा काय दोष आहे? आमच्या मतदारसंघातल्या लोकांनीही काही चूक केलेली नाही. त्यामुळे आमच्या मतदारसंघातल्या सर्व आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करतो. तुमच्याकडे बहुमत आहे. बहुमताच्या आधारावर तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकता, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
अजित पवार फार निर्मळ मनाचे आहेत. त्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे. आमच्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात 25-25 कोटी रुपये देऊन टाकले तर वादच संपतो.
नाना पटोले, काँग्रेस नेते