पर्यटकांना खुणावतेय अक्कादेवी धरण

| चिरनेर | वार्ताहर |

निसर्गाच्या कुशीत डोंगरदर्‍यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागले आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरोधात झालेला स्वातंत्र्यलढा, अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षासहलीसाठी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोर्‍यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे घडत आहे. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोकाविरहित हे धरण आहे. संबंधित चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाने धरण क्षेत्राच्या मध्यभागी पोहण्यास सक्त मनाई केली केली असल्यामुळे पर्यटकांना मौजमजा करण्यासाठी सांडव्यातून बाहेर पडणार्‍या पाण्याखाली भिजून पर्यटक आपला आनंद घेत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.

वाहने पार्किंगसाठी भरपूर जागाही या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने, या ठिकाणी पर्यटकांना खाद्यपदार्थदेखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधिव विहीर असून, या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे. ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या, चिरनेर गावात पर्यटक आल्यानंतर प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतात, तसेच स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, अक्कादेवी धरण गाठतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मोकल यांनी दिली.

Exit mobile version