अंबा नदी सापडली प्रदूषणच्या विळख्यात

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नदी बनतेय डंपिंग ग्राउंड,
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषण आणि घाणीने वेढले आहे. नदीच्या काठावर प्लास्टिक, केरकचरा वाढला आहे. नदीच्या पाण्यावर तवंग व शेवाळ आले आहे. सांडपाणी, प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे नदीचे नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबर नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आंबा नदीच्या पाण्याने पाली गावाची तहान भागते.

पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदिचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदितून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कपंनीमधुन टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदिवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदित टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. किनार्‍यावर टाकलेली घाण व कचरा पाण्यात जातो. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.


प्राण्यांचे हाल
असंख्य पाळीव व वन्यप्राणी यांचे जीवन अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. दुषित पाण्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी इतर पाण्याच्या स्त्रोताचा शोधा घ्यावा लागतो. त्यांचेही हाल दुषित पाण्यामुळे होत आहेत.

अंबा नदीचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषण थांबवून अंबा नदी संवर्धनाची व योग्य नियोजनाची गरज आहे. फिल्टरपणी योजना कार्यान्वित झाली पाहिजे. – महेश पोंगडे, सामाजिक कार्यकर्ते, पाली

आंबा नदी पुलावरून जाणारे येणारे नागरिक अनेकदा वाहनात आणलेले घाण, कचरा, पिशव्या व निर्माल्य पाण्यात टाकत असतात. तसेच पाण्याच्या प्रवाहात देखील साहित्य वाहून येते. नदी काठची घाण कचरा साफसफाई च्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. – आरिफ मणियार, प्रभारी नगराध्यक्ष पाली नगरपंचायत

Exit mobile version