पाणी दुषित, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सबंध पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कारण कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित होतेय, अशातच आता काही मासळीवाले व चिकन व्यावसायिक न विकला गेलेला माल आणि सडलेली मासळी व मेलेल्या कोंबड्या नदित रात्री फेकून देतात. सध्या नदीचे पाणी वाहते नाही. बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व सडते त्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका देखील आहे.
- नगर पंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे. जे कोणी असा प्रकार करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. – मंगेश यादव, जिल्हा अध्यक्ष, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य
- नगरपंचायतीच्या माध्यमातून लगेच या दुकानदारांना नोटीस पाठविण्यात येईल. कोणीही अशा प्रकारे नदीचे पाणी दूषित करू नये. – दिलीप रायण्णावार, तहसिलदार