निवडणूक विभागावर प्रश्नचिन्ह; मंगेश राणे यांच्या तक्रार अर्जावर तहसीलदारांचे मौन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, या स्थानिक निवडणूक प्रक्रियेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रक्रियेत शेकापचे मंगेश राणे व मंजूषा राणे यांनी अर्ज दाखल केले होते. तर, विरोधात मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (दि.15) अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे समोर आले. याबाबत मंगेश राणे यांनी आक्षेप घेतला असून, ती बाब निवडणूक अधिकारी विक्रम पाटील यांच्या निदर्शनासही आणून दिली. मात्र, अवैध ठरू शकणाऱ्या उमेदवाराला वैध करण्यासाठी निवडणूक विभागाकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप मंगेश राणे यांनी केला आहे.
परिणामी, नियम व अटी स्पष्ट असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मंगेश आठवले यांच्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट त्रुटी असूनही त्यावर कारवाई टाळली जात आहे. उलट, नियमांची व्याख्या बदलून किंवा तांत्रिक कारणं पुढे करून त्या उमेदवाराला वैध ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या प्रकारामुळे सर्वांसाठी एकच नियम की निवडकांसाठी वेगळं धोरण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूक विभागाची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा, लोकशाही प्रक्रियेवरच विश्वास उरणार नाही, असे मत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
अन्याय सहन करणार नाही… तर न्यायालयात धाव घेऊ: चित्रलेखा पाटील
नागाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मंगेश आठवले यांच्या अर्जात गंभीर त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या असतानाही निवडणूक यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान उपस्थितांनी स्वतःया त्रुटी पाहिल्याचे सांगितले असूनही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. नियम स्पष्ट असताना त्यांना बगल देत, कागदोपत्री खेळ करून अवैध अर्जाला वैध करण्याचा अहास सुरू आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, जाणीवपूर्वक नियम धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने निवडणूक विभागाच्या निष्पक्षतेवरच शंका निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेला धक्का देणारा हा प्रकार आहे. दरम्यान, संबंधित अर्जाची तात्काळ सखोल चौकशी करून नियमांनुसार तो अवैध ठरवावा. अन्यथा न्यायालयाचे दाद मागण्यात येईल. नियम धाब्यावर बसवून अन्याय चालणार नाही. नियम पायदळी तुडवले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत लढू, असा कडक इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
नागाव पोटनिवडणुकीसाठी मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अभिसाक्षी म्हणून उमेदवाराची लागणारी सही नाही. तसेच उमेदवाराची सही नसताना नोटरी केली आहे. त्यांच्या अर्जात त्रुटी असून, या दोघांचे अर्ज अवैध ठरवावे.
मंगेश राणे,
उमेदवार, नागाव







