बेजबाबदार राष्ट्राकडून सीमेबाबत मनमानीचा कारभार

राजनाथ सिंह यांची अनामिकपणे चीनवर टीका
भारतीय नौदलात आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका दाखल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय नौवदलात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका दाखल झाली आहे. युद्धनौकेवर प्रथमच तिरंगा आणि नौदलाचा झेंडा फडकवण्याचा शानदार कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी विशाखापट्टनम कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाची सागरी शक्ती वाढत असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले असून, त्यांनी चीन चे नाव न घेता चीनच्या सागरी भूमिकेबाबत सडकून टीका केली आहे. 1992 आंतरराष्ट्रीय सागरी सीमेबाबत, विशेष आर्थिक क्षेत्र याबद्दलचे नियम निश्‍चित करण्यात आले होते. मात्र काही बेजबाबदार देश स्वतःच्या हिताकरता अरुंद मार्गांबाबत एकाधिकार वापरत आहेत, सागरी सीमा पाळत नाहीयेत, सागरी सीमेबाबत मनमानी व्याख्या करत असल्याचे मत राजनाथ यांनी प्रतिपादिले आहे.
याचप्रमाणे, नौदलाचे 90 टक्के स्वदेशीकरण झाले आहे. 39 युद्धनौकांची बांधणी देशात वेगाने सुरू आहे. विक्रांतवरही काम जोरात सुरू आहे. कोरोना काळ असतांनाही यामध्ये खंड पडलेला नाही. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना विक्रांतनौदल सेवेत दाखल होईल, यापेक्षा सुवर्ण क्षण दुसरा कोणताच असू शकत नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
याशिवाय, भारत एक जवाबदार देश आहे, युद्धनौकांची बांधणी करणार्‍या नौदलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जगभरात सीमा वाद आहेत, जगभरातील देश लष्करी ताकद वाढवत आहेत. 2023 मध्ये जगभरात संरक्षण दलावरील खर्च हा 2.1 ट्रेलियन डॉलर्स पर्यंत जाणार आहे. संरक्षण दलावरील खर्चात पुढील काही वर्षात आणखी वाढ होणार आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
7400 टन वजनाची आयएनएस विशाखापट्टनम ही 15बी प्रकारातील पहिली युद्धनौका असून आणखी 3 युद्धनौकांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल झाल्यावर याच आठवड्यात आयएनएस वेला ही कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.

एक दृष्टिक्षेप – आयएनएस विशाखापट्टनम

Exit mobile version