| मुंबई | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये बुधवारी (दि. 16) ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. तिन्ही जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे.
एकाच वेळी एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि पाणबुडी यांचे अनावरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिन्हीही युद्धनौका मेड इन इंडिया आहेत. ‘आयएनएस सुरत’ हे पी15बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील 75 टक्के सामग्री स्वदेशी आहे. आयएनएस निलगिरी, हे पी17ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून, भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून राहण्याची क्षमता असून, सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. आयएनएस वाघशीर, पी75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.आयएनएस नीलगिरी हे पी17ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. हे जहाज भारताच्या नौदल डिझाइन कौशल्याचे प्रतीक आहे. त्यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आहे.