हेमंत देसाई
आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चालकविरहित गाडी चालवणे, संगणकानेच एखाद्या पुस्तकाचा काही ओळींमध्ये बसेल असा गोषवारा बनवणे, चित्र काढणे, गोष्टी लिहिणे यासारख्या सर्जनशील कामांनाही गती मिळत आहे. आपल्या ई-मेलमधले स्पॅम ई-मेल ओळखण्यापासून रोगांचे निदान करण्यापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होत आहे. आता हे उत्परिवर्तन पूरक पध्दतीने वापरणे हे आधुनिक मानवापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
मानवी सर्जनशीलता अमर्याद आहे आणि आपण सर्वांनी चॅट जीपीटीकडे साधन म्हणून पाहिले पाहिजे, हे सर्व खरे असले, तरी यामुळे प्रश्नही निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे, वयोमानानुसार कार्यक्षम असूनही नोकरी करण्याची इच्छाच नसणे ही मानसिकताही दिसून येत असून ती देशाच्या विकासासाठी धोक्याची आहे. चांगल्या दर्जाच्या नोकर्या नसल्याने, लाखो तरुण-तरुणींनी नोकरी शोधणेच थांबवले आहे. कोणतीही आर्थिक सुरक्षा नसताना हे घडून येत आहे, हे चिंताजनक आहे. ओपन एआय कंपनीची स्थापना सॅम आल्टमन, इलॉन मस्क प्रभृतींनी 2015 मध्ये केली. पहिल्या पाच दिवसांमध्येच या प्रणालीने दहा लाख सबस्क्राइबर मिळवले. अनेक ज्ञानशाखांमधील प्रश्नांवर तपशीलवार आणि मुद्देसूद उत्तरे देण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. संगणकीय संकेतन लिहिणे, त्यातील दोष दूर करणे, गाण्याला चाल देणे, अशी अनेक कामे चॅट जीपीटी करू शकते. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादने आणि सेवा ग्राहकानुरूप घडवणे आणि सुधारणे शक्य होत आहे. गूगल हा आयटी क्षेत्रातला महागुरू असेल तर चॅट जीपीटी हा त्याचाही बाप आहे, असे म्हणावे लागेल. प्रश्नाचे विश्लेषण करून तयार उत्तर देण्याचे काम या तंत्रज्ञानामार्फत केले जाते. त्यासाठी एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषाप्रणालीचा वापर केला जातो. देशातील अनेक बँका, प्रवासी कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू विकणार्या कंपन्या यामध्ये ग्राहकांच्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तरे देण्याचे काम ‘चॅट बॉट’तर्फे केले जाते.
चॅट जीपीटीवर गणितातील कोड्यांची उकल करता येते. कवितेचा विषय दिल्यास, यमक जुळवून कविता तयार केली जाते. तसेच सॉफ्टवेअरचे कोडिंगही मिळते. विज्ञान, रसायन, शरीरशास्त्र, गणित, भाषा अशा कुठल्याही विषयावर तयार उत्तरे मिळतात. म्हणजे गूगलवर जायची गरजच नाही. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही यापुढे तंत्रज्ञानावर अधिक अलंबून रहावे लागणार आहे. मुळात यामुळे शिक्षकांच्याच नोकर्यांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. परंतु तयार उत्तरातून आकलन आणि सर्जनशीलता या अध्ययनाच्या मूळ हेतूलाच बाधा येऊ शकते. एआय आणि चॅट जीपीटी वगैरे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण तसेच रोजगार समस्यांबाबत गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक आणि अर्थतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी केंद्र सरकारने एखादा कार्यक्रम तयार करावा आणि या कामात नीती आयोगाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता आणि वर्तमान मर्यादा दोन्ही लक्षात घेणे महत्वाचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भावनांचे सार समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची ताकद असेल का? कोणास ठावूक? सध्या मानवी संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीची विविधता यासारख्या क्षमता एक तर नाहीत किंवा फारच मर्यादित आहेत; पण आम्ही बदलाची हाक ऐकत आहोत. सुमारे एक महिन्यापूर्वी, ‘अॅमेझॉन’च्या ‘किंडल’ स्टोअरवर 200 हून अधिक ई-पुस्तके होती. ती एक तर ‘चॅट जीपीटी’द्वारे लिहिली होती किंवा सह-लेखक म्हणून ‘चॅट जीपीटी’चे नाव आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालकविरहित गाडी चालवणे, संगणकानेच एखाद्या पुस्तकाचा काही ओळींत बसेल असा गोषवारा बनवणे, चित्र काढणे, गोष्टी लिहिणे यासारख्या सर्जनशील कामांसाठीही वापर होऊ लागला आहे. आपल्या ई-मेलमधले स्पॅम ई-मेल ओळखण्यापासून रोगांचे निदान करण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत याचा उपयोग होतो आहे. चॅटबोट्स (चॅटिंग करणारे रोबोट्स) आज आपण अनेक वेबसाइट्सवर बघू शकतो. मर्यादित स्वरूपात का होईना, पण हे चॅटबोट्स ट्युरिंग टेस्ट पास करू शकतात. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन किंवा संगणक एवढा हुशार होऊ शकत असेल तर माझ्या अस्तित्वाचे काय? माझ्या नोकरी-व्यवसायाचे काय होणार? हे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर म्हणजे कृत्रिम अथवा यांत्रिक बुद्धिमत्तेचा आपल्या जीवनावर थोड्या फार प्रमाणात प्रभाव जरूर पडणार आहे. अगदी उपजीविकेवरसुद्धा. जे सृजनशीलतेची जशी कथा लिहिणे, चित्रकला, नव-संशोधन अशी कामे करतात, त्यांना धोका कमी आहे. उलट त्यांचे क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अजून बहरेल. पण कामात तोचतोपणा असणार्यांना मात्र पुढे कमी संधी उरणार आहे. ती क्षेत्रे हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्ता काबीज करेल. यंत्रमानवांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी, मानवाला स्वतःमधील अशा संभावना विकसित कराव्या लागतील, ज्या माहिती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात येत नाहीत आणि म्हणून यंत्रमानवाद्वारे नियंत्रित केल्या जाऊ शकत नाहीत. मानवी मेंदूचा र्हास टाळण्यासाठी मानवाला असे काम शोधावे लागेल, जे यंत्रमानव करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की मानवी मेंदूला स्वतःमध्ये एक मानसशास्त्रीय उत्परिवर्तन घडवून आणावे लागेल.
हे उत्परिवर्तन घडवून आणणे हे आधुनिक मानवापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. डिसेंबर महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 8.30 टक्क्यांवर गेला. त्या आधीच्या महिन्यात तो आठ टक्के होता, अशी माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने दिली आहे. हरियाणामध्ये 37 टक्के, राजस्थान 28 टक्के, दिल्ली 20 टक्के, बिहार 19 टक्के आणि झारखंड 18 टक्के अशी सर्वाधिक बेरोजगारी असलेली पाच राज्ये आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण तीन टक्के असून गुजरात 2.3 टक्के, कर्नाटक 2.5 टक्के आणि मेघालय 2.7 टक्के असे प्रमाण आहे. ओडिशामध्ये सर्वात कमी, म्हणजे 0.9 टक्के बेरोजगारी नोंदवण्यात आली आहे. ही सर्व परिस्थिती गंभीर म्हणावी, अशीच आहे. त्यात आता ‘चॅट जीपीटी’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता साधन लाँच झाले असून काही लोक त्याला ‘दुसरे गूगल’ असेही म्हणत आहेत. मंदीमुळे जगभरात ट्विटरपासून अॅमेझॉनपर्यंत अनेक बड्या कंपन्यांमधून कर्मचार्यांना नारळ देण्यात आला आहे. त्यात आता चॅट जीपीटीमुळे लेखकांच्या नोकर्या धोक्यात येऊ शकतात, असे बोलले जात आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाने संयुक्तपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कोणाच्या नोकर्या धोक्यात येतील, याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गणिती, टॅक्स सल्लागार, आर्थिक संख्या विश्लेषक, वेब व डिजिटल इंटरफेस डिझायनर्स, पोर्ट रिपोर्टर्स, मुद्रितशोधक, कॉपी मार्कर्स, अकाउंटंट्स, ऑडिटर्स, पत्रकार व प्रशासकीय सहायक या लोकांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत. उलट, शेतीसामग्री ऑपरेटर्स, ऑटो मेकॅनिक्स, गवंडी, स्वयंपाकी, कॅफेटेरिया अटेंडंट्स, बार टेंडर्स, भांडी घासणारे कामगार, सुतार, रंगारी, प्लंबर्स, दुरुस्ती काम करणारे, खाटीक, पाथरवट यांच्या नोकर्या सुरक्षित आहेत.
भारतातील 65 टक्के लोकसंख्या ही पस्तिशीच्या आतली आहे. म्हणजेच भारत हा तरुणाईचा देश असून करोडो तरुण कामाविना घरी बसून आहेत. त्यामुळे नाक्यावर वा पारावर चकाट्या पिटत बसलेल्या रिकामटेकड्यांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध करणे उपयोगाचे नसते, हे खरेच आहे आणि रोबोटिक्स तसेच एआयमुळे तसेच चॅट जीपीटीमुळे उत्पादन आणि कार्यपद्धतीत वेगाने क्रांतिकारक परिवर्तन येणार आहे. त्यामुळे नव्या नोकर्या निर्माण होण्याचे प्रमाणच कमी होणार आहे, हे नक्की. 2030 पर्यंत भारतात दर वर्षी एक कोटी नोकर्यांची निर्मिती न झाल्यास, बेरोजगारी अथवा छुपी बेकारी कमी होणार नाही. ऑटोमेशनमुळे ज्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर्या निर्माण होतील असे वाटत होते, ती शक्यताच आता संपुष्टात आली आहे. एंट्री लेव्हल प्रोग्रॅमिंग, डॉक्युमेंटेशन, ग्राहक सेवा ही कामे भारतीय कंपन्यांकडे आउटसोर्स होत होती. परदेशातील महाकाय कंपन्यांसाठी भारतीय टेक कंपन्या या प्रकारची कामे करत होत्या. भारतातील धोरणकर्त्यांना या बदलाची कितपत माहिती किंवा जाण आहे, याची कल्पना नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे फार थोड्या लोकांची उत्पादकता वाढणार, हे खरे आहे. परंतु अनेकांच्या नोकर्याच हिरावून घेतल्या जाणार आहेत, हेही कटू वास्तव आहे. नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी शिक्षण व कौशल्य प्रदान करण्याच्या पद्धतीतच बदल करावा लागेल.