। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे,(कातळपाडा) येथील अंगणवाडी सेविका जिविता सूरज पाटील यांना भारत सरकारतर्फे उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून भारत भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान दिल्ली येथे केला जाणार आहे. अडचणींवर मात करीत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत. साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांचा भास आभास हा चारोळी संग्रह, काव्यकुंज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच ती चे अस्तित्व हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. समाजकार्याची विशेष आवड जोपासत असताना तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन ची स्थापना केली. अनेक मुलींना खास करून आदिवासी मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व मुख्य प्रवाहात आणले.
जीवाची पर्वा न करता गरजवंतांना तसेच कोरोनाग्रस्तांना सेवा पुरविली. 54 कोरोनाग्रस्तांना स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना वेळप्रसंगी स्वत:चे दागिने गहाण टाकून मोफत जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम केले.