दोन वर्षांनंतरही कामाला मुहूर्त नाही; रोठा सुपारीच्या भवितव्याचा प्रश्न
| बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे प्रस्तावित असणाऱ्या विस्तारित सुपारी संशोधन केंद्राच्या कामाला दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
सुमारे पाच एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या संशोधन केंद्रातून जिल्ह्यातील सुपारी उत्पादकांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. या केंद्रामुळे श्रीवर्धनसह लगतच्या तालुक्यांतील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावेल, सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यास चालना मिळेल, तसेच कृषी पर्यटनालाही गती मिळेल, अशी आश्वासने देण्यात आली होती. याशिवाय स्थानिक फळे, फुले, भाजीपाला व मसाल्यांच्या पिकांवर संशोधन, तसेच महिलांसाठी प्रक्रिया उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम सूरु न झाल्याने ही आश्वासने केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिल्याची भावना आता बळावू लागली आहे.
बदलत्या हवामानामुळे सुपारी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी रोग व्यवस्थापनाच्या अभावामुळे श्रीवर्धनची ओळख असलेल्या दर्जेदार ‘रोठा सुपारी’च्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, त्याचा थेट फटका स्थानिक सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. भूमिपूजनानंतर दोन वर्षे उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नसल्याने संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि कृषी विद्यापीठ प्रशासन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात कधी मार्गी लावणार, याकडे आता संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे. अन्यथा, पर्यटन विकासाच्या नावाखाली रोठा सुपारीची ओळख आणि स्थानिक शेती संस्कृती पर्यटनाच्या लाटेत वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रारंभी मिळालेल्या निधीतून केंद्राच्या सीमांकनासाठी काटेरी तारांचे कुंपण, छोटी विहीर, प्रवेशद्वार तसेच सपाटीकरणाची कामे करण्यात आली.
सध्या प्राप्त असलेला अनुदानातून या खरीप हंगामापासून सुरवातीला सुपारी पिकांची लागवड, शेततळे, विहीर आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासोबतच कार्यालयीन इमारत आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजुरीचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार बांधकामाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील.
डॉ. प्रशांत शहारे
संशोधन संचालक
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
दिवसेंदिवस वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे बांधकामांसाठी नारळी-सुपारींच्या बागांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे. एकेकाळी हिरवाईने नटलेलं, नारळ-सुपारीच्या सावलीत विसावलेलं निसर्गरम्य दिवेआगर गाव आता हळूहळू आपली मूळ ओळख गमावत चाललं आहे. श्रीवर्धनची ओळख असलेल्या प्रसिद्ध रोठा सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी तसेच नारळ-सुपारी पिकांच्या लागवडीला पुन्हा चालना देण्यासाठी हे सुपारी संशोधन केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अत्यावश्यक आहे.
विरेंद्र कुलकर्णी
नारळ-सुपारी बागायतदार दिवेआगर







