मित्रपक्षांना संपविण्याची भाजपची थिअरी ऐका

। मुंबई । प्रतिनिधी ।

काही दिवसांपुर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भविष्यात देशात फक्त भाजप हाच परक्ष राहील, असे स्पष्टपणे सांगितले होते. यावरुन मित्रपक्षांचे भविष्यच त्यांनी एकप्रकारे अधोरेखित केले होते. मित्रपक्ष भविष्यात कसे नामशेष होतील, याची खबरदारी ते घेत असल्याचेही त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले. म्हणूनच सावधगिरी बाळगत बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

भाजप पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ते निवडणुकीच्यावेळी मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतात. पण त्या निवडणुकीत मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील, याची पुरेपूर खबरदारी भाजपकडून घेतली जाते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे झालेल्या सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कशाप्रकारे संपवले जात आहे, याची एक थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. ते बारामती येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी नितीश कुमार यांची कृती अगदी योग्य असल्याचे म्हटले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे.

महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. आज भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे? भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र बिहार आणि पश्‍चिम बंगालमध्ये दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

नितीश कुमार हे बिहारच्या जनतेमध्ये मान्यता असलेले नेतृत्त्व आहे. महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवताना त्यांचे कमी आमदार कसे निवडून येतील,याची काळजी घेतली. बिहारमध्ये हेच दिसायला लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार सावध झाले. ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपपासून वेगळे झाले. भाजपने काहीही टीकाटिप्पणी करोत पण नितीश कुमार यांचे पाऊल शहाणपाचे आहे. नितीश कुमार यांनी पुढील धोका ओळखून वेळेत खबरदारी घेतली. त्यांच्या राज्याच्यादृष्टीने आणि पक्षाच्यादृष्टीने नितीश कुमार यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Exit mobile version