। मुरूड/जंजिरा । प्रकाश सद्रे ।
पावसाळ्यात तीन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. अशा मच्छिमारांना आर्थिक प्रपंच चालविणे अत्यंत जिकरीचे होते. मुसळधार पावसामुळे कधीकधी हा काळ चार महिन्यांपर्यंत लांबवू शकतो. अशावेळी बोक्षी मासेमारी हा प्रकार सामान्य मच्छिमारांना पावसाळ्यात उपजीविकेचे छोटे साधन ठरत आहे. समुद्र खाडीत डोंगरकपारीतून येणार्या थंड पाण्यात दोन तीन तास उतरून मच्छिमारांना अशी बोक्षी मासेमारी करावी लागते.
पावसाळ्यात होडीवर काम करणारे खलाशी, मासळी विक्रेते, कोळी बांधव यांना अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागते. अशा वेळी काही सामान्य मच्छिमार पेरा, बोक्षी अशा उथळ समुद्र किनारपट्टीवर मासेमारीकडे वळतात. समुद्र खाडीत चालणारी बोक्षी मासेमारी हा असाच प्रकार उपजीविकेचे साधन आहे.
मुरूड जवळील एकदरा गावासमोर खाडीत बोक्षी मासेमारी करणारे किसन कमळ्या बोर्जी आणि उद्देश कमळ्या बोर्जी या कोळी बंधूनी सांगितले की, एकदरा खाडीत छोट्या होडक्यातुन जाऊन 3 ते 4 मीटर समोरासमोर खाडीतील पाण्यात दोन मजबूत काठ्या पाण्यात खोलवर रोवून त्यांना गारफील्ड जाळी बांधून आणि खाली-वर रिंग बांधून सकाळी, दुपारी किंवा रात्री जाळी लावली जाते. ओहटी किंवा भरतीला यामध्ये तुडतूडी कोलंबी, खेकडे, शिंगटी, कधीकधी छोटे जिताडे, रेपट्या, कालेटी अन्य काही मासळी मिळाल्यानंतर तीन ते चार तासानंतर जाळी वर ओढली जाते. यातून तीन जणांना रोजगार मिळू शकतो. 500 ते 600 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. मात्र निश्चित मासळी मिळेल याची शायवती नसते. मुरूडहुन एकदरा मार्गे राजपुरीकडे जाताना बोक्षी मासेमारीसाठी खाडीत लावलेल्या सामोरासमोर मोठया मजबूत काठ्या दिसून येतात.
पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यास नुकसान-पांडुरंग आगरकर
खाडीत अचानक पाणी प्रवाह वाढल्यास लावलेली बोक्षी जाळी वाहून अथवा फाटून 30 ते 40 हजारांचे नुकसान होते. आंबोली धरणांतून अचानक पाणी सोडल्यास हा प्रकार होऊ शकतो. गेल्या वर्षी असा प्रकार होऊन खूप नुकसान झाले होते. कोळी बांधवांना अशा प्रसंगात शासनाकडून आर्थिक सहाय्य देणे अत्यंत गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोळी बांधवांना उपजीविका करणे अवघड असते. तरी देखील अर्थांर्जन करण्यासाठी बोक्षी सारखी मासेमारी करावी लागते.