। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे सर्व जण हैराण झाले होते. प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच अचानकपणे दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार सुरूवात केली. त्यामुळे सर्वत्र गारावा निर्माण झाला असला. मात्र, वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचविण्यांसाठी एकच तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर जंगलात तयार झालेला रानमेव्याला देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
खालापूर तालुक्यात वीट थापायचे काम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने ढगांच्या कडकडासह जोरदार बरसात केल्याने कच्च्या विटा मातीमोल झाल्या आहेत. त्यामुळे वीट भट्टी व्यवसाय मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. आगामी काळात विटांचे भाव गगनाला भिडतील, असे मत बांधकाम व्यवसायिक व्यक्त करत आहेत. तसेच, विविध भट्टी व्यवसायिकांचे शासनाच्या मदतीकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर डोंगरांची काळी मैना म्हणजेच जांभुळ आता तयार होत असल्यांने अवकाळी पावसाने अदिवासी उपजिविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या अवकाळी पावसामुळे तयार केलेल्या सर्व कच्च्या वीटांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या व्यवसायासाठी परराज्यातून कारागीर आणावे लागते. त्यांची पूर्ण जबाबदारी व्यवसायिकांवरच असते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे अर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
कल्पेश पाटील,
वीटभट्टी व्यवसायिक, होराळे