| माणगाव । वार्ताहर ।
रब्बी हंगामातील शेतीला बहर येत आहे. बहरलेल्या शेतामध्ये शेताच्या रक्षणाला उभी असणारी बुजगावणे मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसत आहेत.रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कडधान्य शेती केली जाते. योग्य हवामानामुळे या कालावधीत कडधान्य शेतीला बहर येत असतो. याच कालावधीत अनेक पक्षांचे स्थलांतर होऊन पक्षी तयार झालेली कडधान्य खाण्यासाठी येत असतात. मुबलक खाण्यामुळे स्थलांतर झालेले हे पक्षी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तसेच जंगलातील प्राणी शेतात घुसून नासाडी करतात. या पक्षी व प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूर्वीपासून शेतकरी बहरणार्या शेतामध्ये रंगीबिरंगी बुजगावणे उभी करून ठेवतात, ज्यायोगे पक्षी,प्राण्यांना शेतात कोणीतरी उभे असल्याचा भास होतो व ते शेतात जात नाहीत.
पूर्वीपासून सुरू असलेली बुजगावणे उभारण्याची ही पद्धती आधुनिक काळातही सुरू असून सध्या शेतामध्ये सर्वत्र ठीक ठिकाणी विविध प्रकारची बुजगावणे उभी केल्याचे दिसत आहेत.बुजगावणे म्हणजे कापड व तत्सम वस्तू वापरून तयार केलेले पुतळे असतात. शेतात काठीचा आधार घेऊन माणसासारखी प्रतिकृती उभी केली जाते. दोन काठीचे अधिकचे चिन्ह उभे करून त्यावर शर्ट ,पॅन्ट किंवा इतर कपडे वस्तू घातल्या जातात, मुखवटाही तयार केला जातो. फुटकी मडकी किंवा गोलाकार वस्तू वापरून मानवाचा चेहरा केला जातो. चुना किंवा पांढरा रंग वापरून त्यावर डोळे, नाक रेखाटले जातात. चमकणार्या वस्तू पदार्थांचा यासाठी जास्त वापर केला जातो. अलीकडे यंत्राचा वापर करूनही विविध प्रकारचे आवाज निघण्यासाठी बुजगावण्यात रचना केली जाते.
गोल फिरणार्या भुतासारख्या दिसणार्या बुजगावण्याची सध्या सर्वत्र क्रेझ असून प्लास्टिक किंवा तत्सम वस्तूंचाही मोठ्या प्रमाणात बुजगावणे तयार करण्यासाठी वापर केला जातो. बुजगावणे हे शेतामध्ये उभे असल्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी हे शेतीचे नुकसान करत नाहीत. रात्रीच्या अंधारात हे बुजगावणे हवेमुळे हालचाल करीत असल्याने पक्षी, प्राण्यांना भीती वाटते तसेच यावर काढलेले चित्र चमकत असल्याने पक्षी प्राण्यांपासून शेतीचे रक्षण होते. नायलॉनचे धागे ,प्लास्टिकच्या पिशव्या या सुद्धा बुजगावणे तयार करण्यासाठी वापरल्या जातात. प्लॅस्टिक पिशवी,धागे हवेमध्ये विशिष्ठ आवाज करतात यामुळे ही पक्षी ,प्राणी शेतापासून दूर राहतात.