। रसायनी । वार्ताहर ।
देशात गेल्या काही दिवसापासून ज्ञानव्यापी मज्जिद, भोंगे, आणि नुपुर शर्माच्या माध्यमातून हजरत महंमद पैंगबर यांचे अवमान करणारे वक्तव्य या घटना घडवून आरएसएस देशात हिंदू, मुस्लिम दंगली घडवून देशाची एकता व अखंडता तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा देशविघातक शक्तीविरोधात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या संघटनांचे राष्ट्रीय संयोजक/अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दि. 25 जून रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.
या बंदला पनवेलसह रायगड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी आणि जनतेला या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या बंदच्या आवाहनाला समाजातून चांगले सहकार्य मिळत आहे, अनेक पक्ष सघटनांनी बंदला समर्थन दिले आहे, अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे सहसंयोजक मनोज महाले यांनी दिली आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवीण पाटील, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे मनोज रामधरणे, छत्रपती क्रांती सेनेचे श्रीयश म्हस्कर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे मधुकर म्हात्रे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे मोलाना मोहसीन आदी उपस्थित होते.