गडचिरोली प्रकरणानंतर रायगड पोलीस ॲक्शन मोडवर
| अलिबाग | प्रतिनिधी |
गडचिरोली पोलीस भरतीमधील बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरण उघड झाल्यावर रायगड पोलीसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून, उमेदवारांच्या गावी जाऊन तपासणी केली जात आहे. भरतीच्यावेळी बोगस प्रमाणपत्र देणारे उमेदवार आता पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. रायगड पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व चोखपणे पार पाडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीमधील मैदानी चाचणीपासून कागदपत्रे तपासणी, लेखी परीक्षा अशा अनेक प्रक्रिया पार पाडताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कामकाज करण्यात आले. गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांनी लक्ष ठेवले. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये साध्या गणवेशात पोलिसांना सामील करून आमिष दाखविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले.
जिल्ह्यातील पोलीस शिपाई व पोलीस चालक या 278 पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस लक्ष ठेवून असताना, गडचिरोली येथील बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आले. यामध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई सिद्धेश पाटील याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने गडचिरोली पोलिसांनी रायगड जिल्ह्यात येऊन शुक्रवारी 28 एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर रायगड पोलिसांनीदेखील कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. रायगड पोलीस दलातील पोलीस भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी 35 उमेदवार हे प्रकल्पग्रस्त आहेत. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यातील हे उमेदवार आहेत.
चौकशीसाठी स्वतंत्र पथक
प्रकल्पग्रस्त उमेदवार रायगड पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रकल्पग्रस्त असलेल्या उमेदवारांच्या गावात जाऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तलाठ्यांमार्फत त्यांची माहिती घेऊन त्यांचा सातबारा व प्रकल्पासाठी गेलेली जमीन याची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. मागील दहा दिवसांपासून रायगड पोलिसांनी या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची तपासणी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गडचिरोली प्रकरणानंतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कसून चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून काम पाहात आहे.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड