मंत्री साध्वी निरंजन ज्योतिजी यांचे आवाहन
। नवी मुंबई । वार्ताहर ।
देशात, राज्यात कुठेही महिला मागे नाहीत, प्रत्येक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आहे. ज्या ठिकाणी त्या आहेत त्या ठिकाणी त्या कणखरपणे कार्यरत आहेत. ज्या देशात यमराज्याच्या तावडी मधून स्त्री आपल्या पतीला जिवंत अणू शकते हा स्त्री शक्तीचा विजय आहे. तर लढाईत दुष्मनाच्या पत्नीला बंदी केल्यावर तिची सन्मानाने खणा नारळाने ओटी भरली जाते ही आपली संस्कृती आहे. हा स्त्री सन्मानाचा दाखला छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यावा असे आवाहन केंद्रीय ग्रामविकास व खाद्य राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योतिजी यांनी नवी मुंबई येथे केले.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.रमेश पाटील यांच्या वतीने नवी मुंबई येथे जागतिक महिला दिन व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योतिजी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ.रमेश. पाटील, माजी महापौर सुषमा दंडे, कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोळी, ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी, चिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी व आयोजक अॅड.चेतन पाटील उपस्थित होते. तसेच नवी मुंबईतील कोळी महिला भगिनी उपस्थित होत्या.
आ.रमेश पाटील यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनाचे कौतुक करताना बेटी बचाओ, बेटी पढाओ ही संकल्पना राबविली. त्यामुळे मुलींना मुक्त स्वातंत्र्य मिळाले. तसेच महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करताना कणखर होण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच राज्यात महिला सुरक्षित कशा राहतील याबाबत नेहमीच सत्ताधारी पार्टीकडे आग्रह धरत आहोत. त्याचमुळे शक्ती कायद्या सारखा कायदा लवकरच अमलात येईल असे सांगितले. या कार्यक्रमात केंद्रीय राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योतिजी यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त वाण वाटप केले. तर काही महिलांनी स्वागत गीत, अभंग, उखाणे घेतले त्यांनाही बक्षीस वाटप करण्यात आले.