स्थानिक प्रशासनाकडून समस्येकडे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
सध्या वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे. यामध्ये लांबणारा पाऊस, वेळी-अवेळी कधीही कोसळधार, उशिरा सुरू झालेली थंडी, कडक ऊन्हामुळे कोणता ऋतु कधी सुरू होतो आणि संपतो याचा अंदाज येत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या उरणमधील वातावरणात दिसू लागली आहे. दिवसभर धुरके वातावरण निर्माण होणे हे हवेतील प्रदूषणाचे लक्षण असल्याची शक्यता आहे.
उरणमधील हवाही आता प्रदूषित झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना वाढत्या प्रदूषणाकडे शासकीय यंत्रणेचे व प्रदूषण मंडळाची पूर्णपणे डोळेझाक होताना दिसत आहे. आजच्या घडीला उरणची हवा अतिशय वाईट असल्याची दिसत आहे. या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. प्रदूषणाची नोंद करणाऱ्या संस्थेने केलेल्या निरीक्षणातून उघड होत आहे.
पावसाळ्यानंतर उरणमधील हवेचा दर्जा खालावला आहे. उरणमध्ये रेल्वेचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरिता मातीचे ट्रक या भागात रस्त्यावर धावत असतात. तसेच या भागातील डोंगरावरील मातीचे खणन सुरू आहे. तसेच रसायनयुक्त कंपन्यांमधून दूषित रसायने व हवा सोडली जात असल्याने वातावरण दूषित बनले आहे. यामुळे धूलिकण हवेत पसरून दूषित बनली आहे. त्यातच सकाळ व संध्याकाळी हवेत गारवा निर्माण होताच या वातावरणात धूलिकणाचा स्तर निर्माण होत आहे. या धूलिकणांचा उग्र वास येतो. धुक्याची दाट चादर रात्री 12 नंतर पसरते. हे धुरके एवढे दाट असते, की रात्रीच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धुराप्रमाणे भासते. वायुप्रदूषणामुळे कित्येकदा तोंडावर हात फिरवल्यानंतर तेलासारखा पदार्थ लागतो. या भागातील नागरिकांना रात्री घराच्या खिडक्याही बंद ठेवाव्या लागत आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने दखल घेत नागरिकांनी मास्क वापरण्याची सूचना केली आहे.