आक्षी पुलानजिक स्वच्छता अभियान

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

| नागाव | संतोष राऊळ
|

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील आक्षीच्या प्रवेशद्वार असलेल्या पुलानजिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी वर्गाला नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्यावतीने शुक्रवारी (दि.8) आक्षी पुलाजवळील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या आधी देखील आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा उचलण्यात आला होता. तरीदेखील समाज कंटकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता कोणी या ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा आक्षी सरपंच रश्मी पाटील आणि ढवरचे प्रशासक विजय मयेकर यांनी दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गावर असलेल्या आक्षी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील साखर खाडी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. याच मार्गावरून आक्षीसह नागाव, रेवदंडा व मुरूडकडे स्थानिक, प्रवासी व पर्यटकांची ये-जा सुरू असते. परंतु, हा कचरा बघून स्थानिकांसह पर्यटक आपली नाकं मुरडताना दिसतात. त्यांच्यावर नाक बंद करून प्रवास करण्याची वेळ येते. संबंधित प्रशासनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या आधी आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील समाज कंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन याठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथील कांदळवनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असतानाही संबंधित प्रशासन काहीच कारवाई करत नाही. मात्र, कोणी त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी गेल्यास त्यांच्यावर लगेचच कारवाईचा बडगा उचलला जातो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने, आक्षी सरपंच रश्मी पाटील, ढवरचे माजी सरपंच विश्वनाथ गावंड व प्रशासक विजय मयेकर यांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्षी पुलानजिकचा कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी राजिप माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, ढवर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज पाटील, आक्षी ग्रामपंचायतीच्या सदस्या रश्मी वाळंज, रविंद्र पाटील, संतोष राऊळ आणि ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावारून प्रवास करणाऱ्या स्थानिकांसह प्रवासीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी सरपंच रश्मी पाटील व प्रशासक विजय मयेकर यांनी, या ठिकाणी कचरा टकाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा या मार्गावरील आक्षी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. आक्षी सरपंच, ढवरचे माजी सरपंच यांच्या पुढाकाराने येथील कचरा उचलण्यात येत आहे. या आधी देखील बऱ्याचदा कचरा उचलण्यात आला होता. परंतु, समाज कंटकांकडून या ठिकाणी पुन्हा पुन्हा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कचरा न टाकण्याचे व कायदेशीर कारवाईचे फलक लावणार आहोत. तसेच, लवकरच सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात येतील. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल.

विजय मयेकर, प्रशासक, ढवर ग्रामपंचायत


Exit mobile version