। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अवकाळी पाऊस, बोचरी थंडी आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण या विचित्र वातावरणाने गेल्या आठ दिवसांमध्ये आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या वातावरणामुळे तुडतुडा, फुलकिडा यासारख्या हापूसवरील रोगांना निमंत्रणच ठरले आहे. औषध फवारणी वाढवावी लागत असून, त्यावरील खर्चात भर पडली आहे.
उत्तरेकडील थंड वार्यामुळे कोकणात तापमानाचा पारा घसरू लागला होता. हापूसला पोषक थंडीही पडू लागली. मात्र अचानक रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. दापोलीत काहीवेळ पाऊस पडला.
उशिराच्या टप्प्यात आलेल्या मोहोरामध्ये पावसाचे पाणी साचून बुरशीजन्य रोगांची भीती होती. त्यापासून वाचण्यासाठी बागायतदारांना बुरशीनाशकांची फवारणी करावी लागली. सुरुवातीच्या टप्प्यातील दोन ते तीन फवारण्या करणारा बागायतदार अवकाळीपासून संरक्षण व्हावे, म्हणून चार ते पाच फवारण्या करतोय. अवकाळी पावसानंतर लगेचच कडाक्याची थंडी पडली.
दापोली, खेडमध्ये पारा 9 ते 10 अंश सेल्सियसपर्यंत खाली आला. जिल्ह्यात सगळीकडेच दिवसाचा पाराही घटलेला होता. थंडीमुळे अनेक बागांमध्ये जुन्या मोहोराला पुन्हा मोहोर आला आहे. त्यामुळे जुना मोहोर आणि त्याला आलेली कैरी गळून जात आहे. आधीच बदलत्या हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनाला बसणार आहे.
अवकाळीमुळे फवारणीच्या खर्चात वाढ झाली असून, मोहोर खुडून टाकण्यासाठी मजुरीवर खर्च करावा लागत आहे. एका फांदीला चार मोहोर आल्यामुळे गळ वाढणार आहे.
ढगाळ वातावरणामुळे मोहोरासह कैरीवर तुडतुडा पडणार आहे. काही ठिकाणी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे फळावर काळे डाग पडले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळही झाली आहे.
- ढगाळ वातावरण हापूसवरील रोगराईला निमंत्रण आहे. त्यापासून वाचण्यासाठी फवारणीचा हात द्यावा लागेल. थंडीनंतर पुढे तापमान वाढले तर फळगळीचा त्रास होऊ शकतो. – डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार