। सुकेळी । वार्ताहर ।
वातावरणात चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील फळबागायतदारांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजूला आलेला भरभरुन मोहोर हा संपूर्ण गलतीच्या मार्गाकडे लागला आहे. त्यामुळे फळबागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हातातून निसटुन गेल्यामुळे बागायतदारांना अक्षरशः डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सद्यस्थितीत वातावरणात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. दिवसभर राहणार्या ढगाळ वातावरणामुळे तयार झालेल्या फळबागांना यांचा मोठा फटका बसत आहे. आंबा, काजु तसेच इतर फळझाडांना आलेला मोहोर पूर्णतः खाली जमिनीवर पडुन जिकडे-तिकडे विखुरलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहे. तसेच भाज्यांचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल फळबागांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे यापुढे फळबागांचे उत्पादन करायचे की नाही असा प्रश्न फळबागायतदारांना पडला आहे. दरम्यान तातडीने या फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून फळबागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.