सततच्या घटत्या उत्पादनाने हवालदिल
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
भात, सुपारीसह नारळाचे उत्पादन हे मुरुड तालुक्यातील बागायतदारांचे एक प्रमुख उत्पादन असून, त्यापासून येथील बागायतदार शेतकर्यांना चार पैसे हमखास मिळतात. परंतु, कोकणातील या कल्पवृक्षाला गेल्या काही वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटांची दृष्ट लागल्याने उत्पादनात सातत्याने घट होऊ लागली आहे. त्यामुळे येथील बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुरुड तालुक्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी 435 हेक्टर क्षेत्रावर नारळ पिकाची लागवड करण्यात आली आहे. येथील मुरुड तालुक्यासह नांदगाव, मजगाव, आगरदांडा, मांडला, भोईघर, सर्वे-चिकणी, काशिद, बोर्ली व अन्य अनेक गावागावांतून नारळाचे उत्पादन घेतले जाते. तीन वर्षांपूर्वीच्या निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील 77.47 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे फळे देणारी कित्येक माडाची झाडे अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
येथील बागायतदार हे दोन प्रकारे नारळाचे उत्पादन घेतात. एक तर ते सुकलेले नारळ वीस ते तीस रुपये प्रति नागाने विकतात अथवा येथे असलेल्या ठेकेदारांना (मलबारी) कच्चा नारळ अर्थात शहाळी काढण्यासाठी वर्षाकाठी प्रती झाडाला दोन ते अडीच हजार रुपये घेऊन ठेक्याने देतात. दीड ते दोन महिन्यांत एकदा असे वर्षाला सहा ते सात वेळा झाडांचे पाडे (शहाळी झाडावरून उतरवणे) होतात.
चांगल्या मशागतीत व हवामानात ते शक्य होते अन्यथा बागायतदारांबरोबरच ठेकेदारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागते. कोरोना काळापूर्वी मुरुड तालुक्यातून दर आठवड्याला जवळपास सात ते आठ ट्रक अथवा टेम्पो भरून येथील शहाळी मुंबई अथवा वाशी मार्केटमध्ये जात असत. ते प्रमाण आता दोन चार टेम्पोवर आले आहे.
झाडांवर चढून शहाळी उतरणारे अथवा झाडावरचे सुकलेले नारळ पाडणारे, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी शहाळी वाहून नेणारे अशा सर्वांच्या मजुरीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हंगामात मजूर उपलब्ध न झाल्यास मोठे नुकसान होते. काही बागायतदारांनी आपली माडाची झाडे माडी काढण्यासाठी दिली आहेत.
विविध रोगांचा प्रादुर्भाव मुरुडचे तापमान सध्या 35 ते 40 अंशांवर पोहोचले आहे. बागायतींतील पाण्याचा तळ गाठलेल्या विहिरी व त्यात क्षाराचे वाढलेले प्रमाण यामुळेही फळगळती सुरू आहे. याशिवाय नारळाच्या झाडांना विविध रोगांनी ग्रासले आहे. यात उभ्या झाडाचा कोवळा कोंब कुजून त्यात आळ्या पडणे, झाडांच्या पानांवर करपा रोग पडून झाप करपणे, तंजावर मर रोग पडणे, गेंड्या भुंग्याने झाडाच्या कोंबाला पर्यायाने गाभाच पोखरून टाकल्याने उभे झाड वाळून जाणे, कोळी व पांढर्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडांच्या पानांवर पांढरी बुरशी दिसून येणे. परिणामी झाडांची अन्नरस तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्याने फळांवर काळे डाग पडणे, त्याचा परिणाम खोडावर ही होऊन वेळीच उपाययोजना न केल्यास बाजते झाड मरुन जाणे, असे निरनिराळ्या रोगात झाडे बळी जात आहेत.
कल्पवृक्ष अस्मानी संकटात औषध फवारणीसाठी वापरण्यात येणार्या टू स्ट्रोक पॉवर स्प्रेची किंमत बाजारात पन्नास ते साठ हजार असल्याने गोरगरीब बागायतदारांना खरेदी करणे आवाक्याच्या बाहेरचे आहे. शिवाय, पंपाने फवारणी 25 ते 30 फुटांपर्यंत शक्य होते. येथील माडाची झाडे जुन्या वाणांची उंचच उंच वाढणारी असल्याने 80 ते 90 फुटांपर्यंत फवारणी करणे शक्य होत नाही. माडांच्या झाडांवर चढून नारळ पाडणार्या पाडेकर्यांचीच येथे वानवा असल्याने झाडांवर चढून औषध फवारणी करणे शक्य होत नाही. अशा विविध आस्मानी व सुलतानी संकटाने या कल्पवृक्षाला ग्रासले असून, कोणत्याही कार्यासाठी अग्रक्रमाने लागणार्या या श्रीफळाला व त्याच्या वृक्षाला वाचविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत.