| तळा | वार्ताहर |
लग्नसराईसाठी गावी आलेले चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे तळा बसस्थानक परिसरात चाकरमान्यांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
तळा तालुक्यात रोजगाराचे साधन नसल्याने तालुक्यातील बहुतांश तरुण पिढी व कुटुंबे रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, ठाणे, दिवा, नालासोपारा आदी शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. मात्र, सणवारासाठी हे स्थलांतरित झालेले चाकरमानी आवर्जून आपल्या गावी परतत असतात. एप्रिल व मे महिन्यातील लग्न सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या गावी परतले होते. तसेच मे महिन्यात गावोगावी असलेल्या गावकीच्या पूजा, गोंधळ, पालख्या यांमुळे ओसाड असलेली गावे पुन्हा भरून गेली होती. हे सर्व सोहळे आटोपल्यानंतर चाकरमानी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यासाठी तळा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होऊन बसमध्ये आपली आरक्षित केलेली जागा शोधण्यासाठी प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली.