नद्या स्वच्छतेसाठी सामूहिक शपथ

| चिपळूण । वार्ताहर ।

शासनाने सुरू केलेल्या चला जाणूया नदीला या अभियानात लोकसहभाग वाढावा, लोकांना पाण्याचे महत्व कळावे, नद्यांनी मोकळा श्‍वास घेऊन त्या अमृतवाहिन्या बनाव्यात, यासाठी तालुक्यातील पूर्व विभागातील पोफळी, शिरगांव, मुंढे, चिंचघरी, खेर्डी ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने जलपूजन करत नद्यांच्या स्वच्छतेसाठी सामूहिकपणे शपथ घेण्यात आली.

जागतिक तापमानवाढीचे परिणाम सर्वांनाच जाणवत आहेत. पर्यावरणाचा समतोल साधतानाच नद्यांना अमृतवाहिन्या बनवण्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत नद्यांतील प्रदूषण कमी करायला हवे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून नदीयात्रा काढली जात आहेत.

पूर्व विभागातील पोफळी, शिरगांव, मुंढे, सती चिंचघरी आणि खेर्डीत चला जाणूया नदीला या अभियानाबाबत जनजागृती कार्यक्रम झाले. या निमित्ताने ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, शासकीय अधिकारी, त्या त्या गावातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते. अभियानाचे समन्वयक शहानवाज शाह यांनी अभियानात समाविष्ट असलेल्या विविध बाबींची माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखतानाच नद्या समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे लागेल. कोणी एकाने काम करून नद्या अमृतवाहिन्या होणार नाहीत. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी सर्वांनीच आपापल्यापरीने योगदान द्यायला हवे. पाणीसाठा वाढण्यासाठी गावनिहाय बंधारे, बोअरवेलचे पुनर्भरण करायला हवे. लोकांनी शिस्तीने काम केल्यास पर्यावरण संतुलनात मोठे यश मिळेल, असा संदेश या अभियान जागृतीमधून देण्यात आला.

Exit mobile version