| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्याचा सर्वस्वी निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा होता, असा खुलासा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केला. मात्र, नियमाची चौकट कोणालाही मोडता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले होते. मात्र, भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर ईशान किशनने दौऱ्यावर असताना आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर तो इतर कार्यक्रमांत दिसत होता. झारखंड संघातून खेळण्यापेक्षा त्याने आयपीएलच्या तयारीसाठी हार्दिक पंड्यासह सराव करणे पसंत केले होते.
मुंबईचा खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्याला दुखापत झाल्याचे सांगत रणजी संघातून खेळणे टाळले होते; परंतु त्याला कोणतीही दुखापत नसल्याचे बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून स्पष्ट करण्यात आले होते. मुंबईचा उपांत्यपूर्व रणजी सामना बीकेसी (वांद्रे) येथे सुरू असताना अय्यर ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाच्या सरावात दिसून आला होता. बीसीसीआयने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अय्यर रणजी उपांत्य आणि अंतिम सामन्यात खेळला होता.
निवड समितीतील कोणतेही निर्णय मी घेत नाही, मी त्या बैठकीत केवळ निमंत्रित म्हणून असतो. तसेच, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना वार्षिक करारातून वगळण्याचाही निर्णय अजित आगरकर आणि त्यांच्या निवड समितीने घेतला आहे. त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे माझे काम आहे, असे शहा यांनी सांगितले. हार्दिक पंड्याबाबत वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला असता शहा म्हणाले, हार्दिकने विजय हजारे आणि मुश्ताक अली या राष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले आहे.