| अमरावती | प्रतिनिधी |
भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण, आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिला, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता आहे. पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विचार करा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण, आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला, असे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांची जीभ घसरली. याविरोधात शेतकर्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारच्या पीक विमा योजनेबद्दल सांगताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्याची तुलना थेट भिकार्याशी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक रुपयात पीक विमा ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शेतकर्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री म्हणाले की, आम्ही एक रुपयात पीक विमा दिला. मात्र, लोकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अन्य राज्यांतील लोकांनीदेखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. आम्ही जेव्हा चौकशी केली, त्यावेळी हे सत्य समोर आले. असे अनेक अर्ज नामंजूर केल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे, योग्य त्या शेतकर्याला ती योजना मिळाली पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे कोकाटे म्हणाले. ही योजना बंद होणार का, यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही. परंतु, या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागणार आहेत. मात्र, पीक विमा योजना ही बंद होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.