। चिपळूण । वार्ताहर ।
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राष्ट्रपातळीवर भारत बंदाची हाक देण्यात आली आहे. केंद्र शासनाची ध्येयधोरणे ही विशिष्ट वर्गांभोवती केंद्रीत असून मोदी प्रणित शासन संस्थेच्या हुकूमशाहीविरोधात सोमवार, दि. 27 रोजी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे. या आवाहनात प्रशांत यादव म्हणाले की, शेतकर्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले आहेत. देशात बेरोजगारी वाढत असून तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्याविरोधात एकवटलेला असताना 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची मोदी सरकारने दखल घेतलेली नाही. नेहमीच हुकूमशाहीने वागणार्या केंद्र सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न केला आहे. दहशतवादी, नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचे आरोप करून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे, असे आरोपही यादव यांनी यासमयी केले. आवाहन करताना तेे म्हणाले की, देशातील महागाई वाढवून देशातील सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन, सार्वजनिक संस्था विकत शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. म्हणून भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून सोमवारी दि. 27 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. तेव्हा देशाचे हित जपणार्या प्रत्येक भारतीयांनी या आंदोलनात सहभाग घ्यावा.
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खा. राहुली गांधी यांनी दिलेल्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या आंदोलनात राज्यातील जनतेला पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तरी या आंदोलनात चिपळूण तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, आघाडीचे पदाधिकारी त्याचबरोबर व्यापारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आणि सरकारी व खासगी संस्था, शिक्षण संस्था यांनी कडकडीत बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे. -चिपळूण तालुका काँग्रेस