| माणगाव | प्रतिनिधी |
मशाल निशाणीसमोरील बटण दाबून आपले इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आय पक्षाचे समन्वयक तथा प्रमुख मार्गदर्शक राजाभाऊ ठाकूर यांनी माणगाव येथे काँग्रेस आय पक्ष आयोजित लोकसभा निवडणूक मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना केले.
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होत असून, या निवडणुकीसंदर्भात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आय पक्ष आयोजित मार्गदर्शनपर शिबीर शुक्रवारी (दि.3) कुणबी भवन हॉल, माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यास राजाभाऊ ठाकूर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला जिल्हा काँग्रेसचे चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, निजाम कागदी, काँग्रेसचे श्रीवर्धन मतदारसंघ निरीक्षक आशफाक पानसरे, प्रवक्ते डॉ. दानिश लांबे, शिबीर आयोजक विजय तोडणकर, काँग्रेसचे माणगाव तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुकाध्यक्ष शरद भोसले, म्हसळा तालुकाध्यक्ष डॉ. मुईज शेख, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष सादिक राऊत, रोहा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, समीर परदेशी, निसार फिरफिरे, फैसल अधिकारी, बिलाल कुरेशी, भारत जोडो आंदोलनाचे नरेंद्र जाधव, वैभव पाटील आदी मान्यवरांसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजाभाऊ ठाकूर पुढे म्हणाले की, आज आपल्याला देशासाठी काम करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचा विचार केला नाही तर धनदांडग्यांचा विचार केला. या मोदी सरकारला सत्तेतून बाजूला ठेवायचे आहे. इंडिया आघाडीत 28 पक्ष सहभागी झाले असून, सर्वत्र आघाडीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मणिपूरला महिलांवर अत्याचार झाले. तो अत्याचार सत्तेवर असलेले थांबवू शकले असते; परंतु त्यांनी थांबवले नाही. या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करण्याची वेळ आली आहे. आपल्या मतदानाने आपण देशाचे राजकारण बदलू शकतो, या पद्धतीने मतदान करा. आपले इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना बहुमताने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.