नागरिक त्रस्त
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात थोडासा पाऊस पडला तरीही वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला. तो बुधवारी दुपारी बारा वाजता सुरू झाला.
मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने रानवली धरणाजवळील 12 पोलवर वीज पडल्याने इंसुलेटर तुटले होते. त्यामुळे श्रीवर्धनला होणारा वीज पुरवठा पूर्णपणे बंद पडला होता अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता वाकपैंजण यांनी दिली. सदर बंद पडलेला वीजपुरवठा दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचार्यांना यश आले. वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योजक व पर्यटन व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तरी महावितरणने पाभरे ते श्रीवर्धन या मार्गावरती अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.