| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी (दि.6) दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य केले. या स्फोटात भारतीय लष्कराच्या आठ जवानांसह एक चालक शहीद झाला आहे. तर, सहाहून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
सोमवारी (दि.6) दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये आठ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रविवारी पखंजूरमध्ये सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. आज पंखजूर येथून नक्षलविरोधी संयुक्त मोहीम राबवून जवान परतत होते. नक्षलवाद्यांनी बिजापूरच्या कुत्रू रोडवर जवानांचक वाहन आयईडीचा स्फोटने उडवले. दंतेवाडामध्ये संयुक्त मोहीम राबवून हे जवान छावणीत परत येत होते. यावेळी हा स्फोट घडवून आणल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अनेक डीआरजी कर्मचारी पिकअपमध्ये होते. असे सांगितले जात आहे की, आयईडी हा सुमारे तीन किलो वजनाचा स्फोटक होता. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवानांच्या वाहनाचे तुकडे झाले. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सरकार झुकणार नाही
जेव्हा जेव्हा सरकार नक्षलवाद्यांविरोधात अशा प्रकारेचे मोठे ऑपरेशन करते तेव्हा नक्षलवादी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात असे छत्तीसगडचे विधानसभा अध्यक्ष रमन सिंह यानी म्हटले आहे. नक्षलवादाच्या विरोधात छत्तीसगड सरकारने जे आक्रमक मोहीम सुरु केली आहे. तिचा वेग आणखी वाढविला जाणार आहे. सरकार अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु राहील, असेही ते यावेळी म्हणाले आहे.
हल्ल्याचा निषेध
नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची माहिती विजापूरमधून आली आहे. मी शहीद जवानांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. हा भ्याड हल्ला आहे. नक्षलवाद्यांना जवान संपवण्याच्या दिशेने काम करीत आहेत असे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साओ यांनी म्हटले आहे.
जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. पण, आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची मी खात्री देतो. तसेच मार्च 2026 पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू, असे देशवासियांना अश्वस्त करतो.
अमित शह,
केंद्रीय गृहमंत्री