। उरण । वार्ताहर ।
मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेले, वादळामुळे भरकटलेले दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्यावर पोहोचले आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची कोस्टगार्ड व नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंकाकुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
मुंबईकडून एसएन ऑल कंपनीचे एमव्ही-श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही-जी 2 हे दोन मालवाहू बार्ज धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाले होते. मात्र वादळामुळे समुद्रात उसळणार्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून हे दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव-माणकेश्वर मंदिराच्या किनार्यावर येऊन ठेपले.
एमव्ही- श्रीकांत हे रिकामी बार्ज केगाव-माणकेश्वर मंदिराजवळ तर एमव्ही- जी 2 अरब इंटरप्राईझेस हे बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनार्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागले. या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्टगार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली. तसेच नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस अधिकारी पृथ्वीराज भामरे आणि तहसिलदारांच्या पथकानेही पाहणी केली आहे.
या दोन्ही बार्जवर प्रत्येकी पाच-सहा खलाशी आहेत. या दोन्ही बार्जच्या खलाशांकडे चौकशी करण्यात आली. यावेळी मदतीची आवश्यकता नसल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. चौकशीअंती रेडअलर्ट उठविण्यात आल्यानंतर दोन्ही बार्ज धरमतरकडे रवाना होणार आहेत. तसेच कर्मचार्यांनीही कुटुंबियांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविले असल्याची माहिती अंधारे यांनी दिली आहे.