रिक्षा चालक-मालक संघटना न्यायाच्या प्रतीक्षेत
। उरण । वार्ताहर ।
नवीमुंबई येथील एनएमएमटीची बस सेवा गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गे कोप्रोली अशी सुरु होणार असल्याने एक हजार रिक्षा, टँक्सी चालकांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे सहा आसानी मिनिडोर टँक्सी आणि तिन चाकी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सदर एनएमएमटीच्या बस सेवेला विरोध दर्शविला आहे.
सहा आसानी मिनिडोर टँक्सी आणि तिन चाकी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्यांनी व सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे युवा नेते राजेंद्र भगत यांनी माहिती देताना सांगितले की, उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. त्यातच अनेक प्रकल्प, कंटेनर यार्ड बंद पडू लागल्याने काही कामगार वर्गाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा गंभीर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी आप आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हात भार लावण्यासाठी बँकेकडून कर्ज काढून तिन चाकी रिक्षा व टॅक्सीचे परवाने आर.टी.ओ कार्यालयाकडून प्राप्त करून घेतले आहे.
सदर रिक्षा चालक हे नवीमुंबई, पनवेल परिसरात ये-जा करणार्या प्रवाशांना गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गे कोप्रोली पर्यंत आप आपल्या वाहनातून सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्या प्रवासातील भांड्यातून मिळणार्या उत्पन्नातून रिक्षा चालक-मालक हे बँकेचे हप्ते आणि आप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा बसा चालवत आहेत, असे असताना नवीमुंबई परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे ग्रामीण भागातील तरुणांचा उदरनिर्वाहाच साधन हिरावून घेण्यासाठी नवीमुंबई येथून एनएमएमटीची बस सेवा गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गे कोप्रोली अशी सुरु करण्याचा घाट घालत आहेत. त्यामुळे एक हजार रिक्षा चालक-मालकांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. तरी शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून रिक्षा चालक-मालक संघटनेला सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.