शासनाच्या आदेशाला केराची टोपली; पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, त्या भागातील शेती नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना असलेले तेथील ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु, तेथे कोणी पोहचले नाहीत. शेतकऱ्यांची ही कैफियत किसान क्रांती संघटनेने तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे का केले गेले नाहीत अशी विचारणा तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना केली आहे.
कर्जत तालुका आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश शासनाच्या वतीने कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी दिले होते. त्यासाठी तालुक्यातील सर्व 210 महसुली गावातील पंचनाम्यांचा तपशील जाहीर केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव आणि आदिवासी वाडीमध्ये एकतर कृषी सहायक कृषी पर्यवेक्षकांची तर काही ठिकाणी महसूल ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मात्र, शासनाच्या या आदेशाचे पालन होताना दिसून येत नाहीत अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. यासाठी शेतकरी तलाठी सजा नेरळ येथे जाऊन विचारणा केली असता. तलाठी यांनी उलट उत्तर देत अरे-रावेची भाषा वापरण्यात आली. तसेच आता पंचनामे करून झाले असून, सर्व कागदपत्रे आम्ही तहसीलदारांना सादर केली आहेत, असे सांगण्यात आले.
अशाप्रकारे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अशा समस्या असू शकतात. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांची कागदपत्रे ही सादर केली नसतील अशा शेतकऱ्यांना तहसीलदार धनंजय जाधव यांनी तलाठ्यांना सूचना देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश द्यावे. तसेच तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी यामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या प्रकरणी किसान क्रांती संघटनेने त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया ची दखल समाज माध्यमांनी घेतली. त्यांनतर चक्रे फिरली असून, कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर आपली वक्रदृष्टी दाखवली आहे.
नेरळमधील कुंभे गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने तलाठी सजा नेरळ येथे जाऊन आपल्या नुकसानीचे माहिती सांगितली असता, नाव नंबर लिहून घेतले. त्यानंतर तलाठ्यांनी आम्ही येऊन पंचनामे करू असे निरोप दिला. अनेक दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहिली परंतु तलाठी पंचनाम्यासाठी
आले नाहीत.
सदानंद शिवराम भोईर
शेतकरी, नेरळ-कुंभे





