देहरंग धरण जवळ असूनदेखील आजूबाजूच्या आदिवासी वाड्या तहानलेल्या
| पनवेल | वार्ताहर |
शहरातील पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे. टँकरशिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही. देहरंग धरण जवळ असूनदेखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत. त्यामुळे धरण उशाशी असतानाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते. या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेलमध्ये आहे. देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी, कोंबल टेकडी, औसाची वाडी, सतीची वाडी, धामणी, कोंड्याची वाडी आदी आदिवासी वाड्या आहेत. गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे. एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना, या आदिवासी वाड्यांमधील रहिवासी पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत. शहरी भागात एका फोनवर टँकरचे पाणी उपलब्ध होते. याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते. मात्र, हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आदिवासी वाड्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवांना कसरत करावी लागते, अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे. तरी शासनाने तालुक्यात जलजीवन मिशनची अर्धवट असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक आदिवासी बांधव करीत आहेत.