धनावडे यांचे कवितेच्या सुरातून पुस्तक संदर्भग्रंथ

कवी ए.के. शेख यांचे प्रशंसोद्गार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

एका कवीबद्दल दुसरा कवी चांगले बोलत नाही. मात्र कवी रमेश धनावडे यांनी कवितेच्या सुरातून या पुस्तकाद्वारे 63 कवींची त्यांच्या काव्याच्या रसास्वादासह माहिती देऊन मौलिक कार्य केले आहे, त्यांचे हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गझलकार ए.के. शेख यांनी केले.

साहित्यिक, कवी रमेश प्रभाकर धनावडे यांच्या कवितेच्या सुरातून या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श पतसंस्था सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आ. पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, डॉ. राजू पाटोदकर, अ‍ॅड. प्रदीप घरत, सुधीर शेठ, दीपक रानवडे, संजय गुंजाळ, नाईक, नागेश कुळकर्णी, मंगेश तावडे, प्रभाकर धनावडे, पूनम रमेश धनावडे, उमाजी केळुसकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी पंडित पाटील यांनीही खुसखुशीत शैलीत रमेश धनावडे यांची लेखन यात्रा अशीच अखंडित राहो अशा शुभेच्छा दिल्या. सुधीर शेठ, दीपक रानवडे, अ‍ॅड. प्रदीप घरत, डॉ. राजू पाटोदकर, साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी आपल्या भाषणांतून रमेश यांच्या पुस्तकास आणि त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कवी रमेश धनावडे यांनी आपल्या मनोगतात या पुस्तकामागची भूमिका मांडली.

कार्यक्रमाची सुरुवात तेजल रमेश धनावडे यांच्या नृत्याने झाली. याप्रसंगी नवीन कार्यालयाचा शुभारंभ होत असल्याबद्दल आर्किटेक्ट अपूर्वा धनावडे हिचा, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल श्रृती देसाई-राजे यांचा, कवितेच्या सुरातून या पुस्तकाचे प्रकाशक साहित्य प्रकाशनाचे वैभव धनावडे यांचा, तसेच श्रद्धा पोखरणकर, जीविता पाटील, महेश कवळे, तपस्वी गोंधळी यांचा सन्मान करण्यात आला. वैभव धनवाडे यांनी रमेश धनावडे यांना यावेळी पुस्तक रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. या प्रकाशन समारंभासाठी मोठ्या प्रमाणात रसिकांची उपस्थिती होती.

Exit mobile version