रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवण्याची मागणी
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात रस्त्यांवर होणाऱ्या अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक, सुरक्षा आणि नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय राटाटे यांनी प्रशासनाला थेट इशारा देत, पुढील आठ दिवसांत रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
धाटाव एमआयडीसी परिसरात दररोज शेकडो केमिकल टँकर तसेच इतर अवजड वाहने मुख्य रस्त्यांच्या कडेला तासन्तास उभी राहत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. या वाहनांमुळे रस्ते अरुंद होत असून, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्र असल्याने या मार्गावर कामगार, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
दरम्यान, जैनवाडी स्टॉप परिसरात खासगी पार्किंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. संबंधित पार्किंगला आवश्यक शासकीय परवानग्या आहेत का ? तसेच ते कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून पार्किंग व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिकाही मनसेने घेतली आहे.
मनसेच्या वतीने प्रशासनाला तातडीने रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटविणे, वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे आणि धाटाव एमआयडीसी परिसरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मनसे रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अक्षय राटाटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रशेनावर काय भूमिका घेते आणि पुढील आठ दिवसांत कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अनेक टँकरमध्ये धोकादायक रासायनिक पदार्थांची वाहतूक केली जाते. अशा परिस्थितीत एखादा अपघात, गळती किंवा आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे.
अक्षय राटाटे
मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष







