विकासाला गती देणारा प्रकल्प कागदावरच
| माणगाव | सलीम शेख |
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख देणारा दिघी-पुणे पर्यायी मार्ग सध्या केवळ समन्वयाअभावी अडलेला स्वप्नमार्ग ठरला आहे. श्रीवर्धन जवळील दिघी बंदर ते पुणे या अंतराला गती देणारा, वेळ व खर्चाची मोठी बचत करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ 6 ते 7 किमी अपूर्ण रस्त्यामुळे रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. दोन जिल्ह्यांच्या सीमा रेषेवर उभा असलेला हा अपूर्ण टप्पा म्हणजे विकासाच्या महामार्गातील ‘बॉटलनेक’ ठरत असून, रायगड आणि पुणे प्रशासनातील समन्वयाचा अभाव या प्रकल्पाच्या गतीला निर्णायक अडथळा ठरत आहे.
दिघी-पुणे या नव्या मार्गामुळे सुमारे 25 ते 30 किमी अंतर कमी होणार आहे. त्यामुळे पर्यटक, नागरिक व प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्र पुणे ते रायगड हे अंतर कमी वेळेचे व सुलभ प्रवासासाठी राहणार आहे. हा प्रवास सुलभ करण्यासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात येत आहेत. पहिल्या पर्यायात मुळशी, वाघेवाडी व ताम्हिणी परिसरात पूल व बोगदा उभारण्याचा प्रस्ताव आहे. दुसरा आणि अधिक प्रभावी पर्याय म्हणजे माणगाव, बोरवाडी, पानशेत, पुणे हा मार्ग पूर्ण झाल्यास तब्बल 25 ते 30 किमी अंतर कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होऊ शकतो. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी मावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा रस्ता पुर्ण करण्याचे आश्वासन ग्रामस्थ व नागरिकांना दिले होते.
या मार्गातील बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी घोळ या गावापर्यंतचा सुमारे 7 किमीचा टप्पा अद्याप अपूर्णच आहे. त्यातील 4 किमी भाग रायगड जिल्ह्यात, तर 3 किमी भाग पुणे जिल्ह्यात येतो. मात्र, दोन्ही जिल्ह्यांतील बांधकाम विभागांमध्ये तसेच दोन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात अपेक्षित समन्वय नसल्यामुळे हा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा दुवा अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. परिणामी, हजारो कोटींच्या विकासाला गती देणारा प्रकल्प कागदावरच अडकून पडला आहे.
सध्या ताम्हिणी घाट हा कोकणपुणे दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. मात्र, अरुंद रस्ता, तीव्र वळणे, धोकादायक उतार आणि वारंवार होणारे अपघात यामुळे ताम्हिणी घाट हा मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो. हा नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास ताम्हिणी घाटावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल अशी प्रवासी पर्यटकांची मागणी आहे.
दिघी-पुणे पर्यायी मार्ग पूर्ण झाल्यास सुमारे 25 ते 30 किमी अंतर कमी होणार असून प्रवास वेळेत आणि खर्चात लक्षणीय बचत होईल. मुळशी-ताम्हिणी पूल व बोगदा हा पहिला पर्याय तर माणगाव, कुंभे, घोळ व पानशेत मार्ग हा दुसरा प्रभावी पर्याय मानला जात आहे, जो ताम्हिणी घाटावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. 38 हजार कोटींच्या गुंतवणुकीत उभारले जाणारे दिघी बंदराचा पुण्याशी थेट संपर्क झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.
डॉ. मोहन दोशी,
सामाजिक कार्यकर्ते, माणगाव
नवीन मार्गामुळे श्रीवर्धन, महाड आणि दक्षिण कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल. तर, कुंभे-पानशेत परिसर पर्यटन केंद्र म्हणून नव्याने उदयास येण्याची शक्यता आहे. सुरक्षित आणि कमी वेळेत होणारा प्रवास पर्यटकासाठी आकर्षण ठरणार असून दोन जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. केवळ 7 किमीचा दुवा पूर्ण झाला तर दिघीपुणे पर्यायी मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा खरा गेमचेंजर ठरू शकतो.
पंकज तांबे,
जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस






