| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा आहे. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत. न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अजून निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. अशातच आता महायुतीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
सध्या राज्यातील सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. परंतु, आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबरला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील. तर, 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. तसेच, जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील. मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, वळसे पाटलांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.







